यवतमाळ - नव्वद दिवसांचे नगदी पिक म्हणून शेतकरी सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मात्र, यावर्षी आस्मानी संकटामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक मातीमोल झाले आहे. वारंवार येणाऱया संकटांना कंटाळून मारेगाव तालुक्यातील एका शेतकऱयाने आपल्या तीन एकर सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरवले आहे. मारोती गौरकार असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
काढणीचा खर्चही निघेना -
यावर्षी सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कपाशी सोबतच सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. मात्र, सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणे भरण्याच्यावेळी अतिवृष्टी आणि हवामानातील बदलामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काठी ठिकाणी तग धरून राहिलेले सोयाबीन पावसामुळे भिजल्याने ते काढण्यायोग्य राहिले नाही. अशा सोयाबीनची काढणी देखील परवडणारी नाही. मारोती गौरकार यांच्या तीन एकर सोयाबीनचीही अशीच अवस्था झाली आहे. त्यामुळे त्यांनी शेतात रोटावेटर फिरवला.
हेही वाचा -संकटांना कंटाळून दहा एकर सोयाबीनवर शेतकऱ्याने फिरवले रोटावेटर