महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 8, 2020, 1:16 PM IST

ETV Bharat / state

महिला दिन विशेष: आदिवासी महिलांच्या गोडंबी व्यवसायातील वास्तव

मालेगाव तालुक्यातील ग्राम अमानी येथील आदिवासी महिला या गेल्या १०० वर्षांपासून बिबा फोडणे व त्यातून गोडंबी काढणे हा व्यवसाय करत आहेत. त्यामुळे अनेक महिला आणि मुलींच्या शरीरावर इजा झाल्या आहेत. यासंबधी ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट...

world womens day special story in washim
महिला दिन विशेष

वाशिम - मालेगाव तालुक्यातील ग्राम अमानी येथील आदिवासी महिला या गेल्या १०० वर्षांपासून बिबा फोडणे व त्यातून गोडंबी काढणे हा व्यवसाय करत आहेत. त्यामुळे अनेक महिला आणि मुलींच्या शरीरावर इजा झाल्या आहेत. काहींचे चेहरे विद्रुप झाले आहेत. या महिलांना पोटाची खळगी भरण्यासाठी इच्छा नसतानाही बिब्याचे तेल हाती घ्यावे लागत आहे. तेच तेल या महिलांच्या सौंदर्याला मारक ठरते आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या शरीराची पर्वा न करता जीव धोक्यात टाकून कामे करावी लागत आहेत.

बिब्यातली गोडंबी काढून धनिकांची देहयष्टी सांभाळणारा येथील आदिवासी समाज मात्र बिब्याच्या तेलाने पार होरपळला आहे. गोडंबी काढताना चेहऱ्यावर उडणाऱ्या बिब्याच्या तेलाने येथील कितीतरी मुली विद्रुप झाल्याने त्यांच्या भावी संसाराची राखरांगोळी झाली आहे. हे काम विशेषत: महिला व मुलींना करावे लागत आहे. शेती आता मशीनद्वारे होते आणि दुसरे कुठलेही काम मिळत नाही. रोजगार हमी योजनेची कामेही थंड बस्त्यात आहेत. त्यामुळे घर संसाराचा गाडा कसा चालवावा हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर आहे. म्हणून बिबा फोडणे व त्यातून गोडंबी काढणे यातून शरीरावर इजा होत आहेत.

आदिवासी महिलांच्या गोडंबी व्यवसायातील वास्तव

या व्यवसायाने वयात आलेल्या आदिवासी समाजाच्या मुलींचा चेहरा विद्रूप झाला आहे. त्यामुळे त्यांना बघायला येणाऱ्या मुलांकडून नापसंती मिळत आहे. मजुरीमध्ये त्यांना रोज जेमतेम 100 रूपये मिळतात. त्यावरच त्यांना उदरनिर्वाह करावा लागतो. अमानी फाट्याजवळ एमआयडीसीसाठी 20.80 हेक्‍टर जमीन संपादित करण्यात आली आहे. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून तेथे फक्त एक फलक नावापुरतेच उभे करण्यात आले आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या वाशीम येथील एमआयडीसी क्षेत्राचीही यापेक्षा वेगळी कहाणी नाही. आज 30 वर्षे होऊनही येथील औद्योगिक वसाहत अविकसित आहे. जिल्हा निर्मितीनंतर काही वर्षांत शहरात नवीन उद्योगनिर्मिती होणार, ही येथील नागरिकांची अपेक्षापूर्ती ११ वर्षे उलटून गेली तरी झाली नाही.

३० वर्षांपूर्वी तत्कालीन विधिमंत्री गुलाम नबी आझाद यांनी येथील औद्योगिक वसाहतीचे भूमिपूजन केले. या क्षेत्रासाठी सुमारे 219 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. अद्यापही येथे एखादा लघु उद्योग अथवा कारखाना सुरू झाला नाही. आवश्‍यक सुविधांचा अभाव असणे हे त्यामागील एक प्रमुख कारण आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details