वाशिम- जिल्ह्यात काल पावसाने दमदार हजेरी लावली होती. यामुळे पहिल्याच पावसानंतर आज जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाच्या पेरणीला सुरुवात केली. तसेच शिरपूर परिसरात शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून ओळख असलेली हळद पिकाच्या लागवडीलाही सुरुवात केली आहे.
पहिल्याच पावसानंतर वाशिम जिल्ह्यात पेरणीला सुरुवात
वाशिम जिल्ह्यात पावसाच्या दमदार हजेरीनंतर शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली आहे.
मात्र, जमिनीत पाऊस मुरल्याशिवाय पेरणी न करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. परंतु जून महिना संपत असल्याने पेरणीची वेळ निघून जात आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीची घाई करत आहे.
वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला असून शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांनी प्रामुख्याने सोयाबीनची पेरणी करत असताना प्रथम जमिनीतील ओलावा तपासून नऊ इंचापेक्षा जास्त जमिनीत ओलावा नसल्यास पेरणी करू नये, असे आवाहन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) द्वारा शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.