महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 14, 2019, 8:38 AM IST

ETV Bharat / state

कारंजा येथील ऐतिहासिक वास्तू जीर्णावस्थेत; नागरिकांचा मृत्यूच्या दाढेतून प्रवास

कारंजा येथील ऐतिहासिक चार मुघलकालीन वेशी काळानुसार ढासळण्याच्या स्थितीत आहेत. कारंजाकरांचे रोज या वेशीखालून मार्गक्रमण सुरू असते. सध्या या वेशींच्या अतिशय खराब स्थितीमुळे शहरवासियांकडून या वेशींच्या दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे. यातील एका वेशीचे काम पूर्ण झाले असून, दुसऱ्या वेशीचे काम संथगतीने सुरू आहे. उर्वरित वेशींचे कामही लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

जीर्णावस्थेत असलेली वेशी

वाशिम - कारंजा लाड शहराच्या ऐतिहासिक संपन्नतेची साक्ष देणाच्या चारही मुघलकालीन वेशी आता अखेरच्या घटका मोजत आहेत. कधी काळी शहराची सुरक्षा करणाऱ्या याच वेशी सद्यस्थितीत शहरातील नागरिकांच्या जीवासाठी धोकादायक बनल्या आहेत.


ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कारंजा शहराच्या चारही दिशेला टोकाच्या ठिकाणी पोहा वेश, दारव्हा वेश, दिल्ली वेश आणि मंगरुळ वेश अशा चार वेशी आहेत. त्यापैकी एका वेशीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या एका वेशीच्या दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू आहे. परंतु, उर्वरित दोन वेशींच्या दुरुस्तीचे काम अद्यापही हाती घेण्यात आलेले नाही. हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी शासनस्तरावर कोणतेही विशेष प्रयत्न केले जात नाहीत, ही मोठी खेदाची बाब आहे. कारंजा शहराला मोठा वैभवशाली इतिहास असून शहरातील प्राचीन वास्तू त्याची साक्ष देत उभ्या आहेत.

जीर्णावस्थेत असलेली वेशी


सद्यस्थितीत मंगरुळ दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असल्यामुळे त्याखालून भीतीमुक्त रहदारी होत आहे. त्यानंतर मागील दोन ते तीन महिन्यांपासून पुरातत्व विभागाच्या वतीने पोहा वेशीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. मात्र, हे काम अतिशय संथगतीने होत असल्याचा आरोप जनतेतून केला जात आहे. या वेशीच्या कामामुळे त्याखालील वाहतूक बंद करून ती दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना फेऱ्याने प्रवास करावा लागत आहे. कामाची गती संथ असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

जीर्णावस्थेतील ऐतिहासिक वास्तूंमुळे वाहतुकीचे हाल


दुसरीकडे दारव्हावेश अतिशय जीर्ण झाली असून देखील या वेशीखालून जनतेचे आवागमन सुरूच आहे. कुठलीही अनुचित घटना घडण्यापूर्वी या वेशीची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details