क्षमतेपेक्षा जास्त गौण खनिजाची वाहतूक; अवजड वाहनांमुळे कारंजा-शेमलाई रस्त्याची चाळण
समृद्धी महामार्गाच्या कामासाठी लागणारे गौणखनीज हे वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालूक्यातील शेमलाई येथून आणले जाते. त्यामूळे कारंजा ते शेमलाई खदानी दरम्यान रात्र आणि दिवस मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वर्दळ असते.
वाशिम - समृद्धी महामार्गाच्या कामासाठी लागणारे गौणखनीज हे वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील शेमलाई येथून आणले जाते. त्यामुळे कारंजा ते शेमलाई खदानी दरम्यान दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वर्दळ असते. परिणामी या जड वाहनांच्या वाहतुकीमुळे येथील रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे स्थानिक वाहनधारकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.
पावसाळा असल्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांसह इतर वाहनचालकांना गाडी चालवताना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी या खड्ड्यामुळे अपघात घडत आहेत. समुद्धी महामार्गासाठी सुरू असलेल्या गौण खनिजाची वाहतूक ज्या वाहनांमधून केली जाते, त्या वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त गौनखनिजाची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते दबले जात आहेत. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. गौणखनिजाची दीडपट होणारी वाहतूक थांबवावी. तसेच या गंभीर बाबींकडे प्रशासनाने लक्ष देऊन मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.