वर्धा : येथे युवक काँग्रेसच्यावतीने 'रोजगार दो आंदोलना'चा इशारा देण्यात आला. मात्र, यासाठी परवानगी नाकारण्यात आल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून हा मोर्चा पायदळ मार्च जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाताना पोलिसांसोबत झटापटीचा प्रकार घडला. यानंतर पदाधिकाऱ्यांना थांबत पाच जणांनी जाऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सोपवले.
वर्ध्यात युवक काँग्रेसचे विनापरवानगी 'रोजगार दो आंदोलन', पोलिसांनी परवानगी नाकारल्याने वातावरण तापले - rozgar do agitation wardha news
वर्ध्यात युवक काँग्रेसच्यावतीने 'रोजगार दो आंदोलन' करत निवेदन देण्याचे ठरले. पोलिसांना परवानगी मागण्यात आली मात्र, त्यांनी परवानगी नाकारली. या नंतर, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाताना पोलिसांनी परवानगी नसल्याच्या कारणावरून त्यांना अडवले असता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची पोलिसांसोबत झटापट झाली.
हे आंदोलन युवक काँग्रेसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात करण्यात आले. केंद्र सरकारातर्फे दरवर्षी दोन करोड तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले होते त्याचे काय झाले, हा प्रश्न विचारण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करत निवेदन देण्याचे ठरले. यासाठी एनएसयुआयच्या वतीने पोलिसांना परवानगी मागण्यात आली. ही परवानगी पोलिसांनी नाकारल्याने निवेदन देण्यासाठी युवक काँग्रेसचे पदाधिकारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जमा होत निवेदन देण्यासाठी गेले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जातांना पोलिसांनी परवानगी नसल्याच्या कारणावरून त्यांना अडवले असता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची पोलिसांसोबत झटापट झाली. आम्हाला निवेदन देऊ द्या, म्हटल्यानंतर पाच जणांना जिल्हाधिकारी कार्यलयात जाऊन निवेदन देण्यास परवानगी देण्यात आली.
यावेळी मोदी सरकारने दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले. कोरोनामुळे जवळपास 30 कोटी लोकांचे रोजगार गेले. केंद्र सरकार त्यांना न्याय मिळवून देईल अशी आशा आहे, असे यावेळी आंदोलक म्हणाले. दरम्यान, काँग्रसेचा नवीन अध्यक्ष कोण होणार, यावरून चर्चेला उधाण आले आहे. यावेळी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत यांनी राहुल गांधीच युवकांचे नेते आहे. आमची युवकांची इच्छा आहे की राहुल गांधीच अध्यक्ष झाले पाहिजे असे मत व्यक्त केले.