वर्धा- महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या पावन स्मृतीने जिल्ह्याला जागतिक पातळीवर नावलौकिक मिळाले आणि सोबतच खादीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. खादी हा केवळ कापडच नाही तर गांधींचा विचार आहे. खादीचे महत्त्व स्वातंत्रपूर्व काळापासून आता कोरोनाच्या काळापर्यंत अबाधित आहे. याच भारतीय खादीचे मास्क इंग्लंडवासीयांना पसंतीस पडली आहे. पाहुयात हा विशेष रिपोर्ट..
वर्ध्याच्या खादी मास्कला इंग्लंडमध्ये पसंती; लवकरच होणार निर्यात - खादीचे मास्क इंग्लंडला पाठवणार
महात्मा गांधी हे स्वतः चरख्यावर सूत कातून कापड तयार करत आणि ते परिधान करत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी डब्लूएचओने मास्क घालण्याची शिराफस केली आहे. यासाठी नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या कापूस आणि त्यापासून तयार झालेला खादीच्या कापडाला चांगली मागणी आहे. याच खादीच्या कापडापासून मास्क तयार केले जात आहे. हे मास्क इंग्लंडवासियांच्या पसंतीस उतरले आहे. हे मास्क बनवून देण्याचे काम वर्ध्याच्या गोपुरी येथील ग्रामसेवा मंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.
![वर्ध्याच्या खादी मास्कला इंग्लंडमध्ये पसंती; लवकरच होणार निर्यात wardha khadi mask Export to england](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8426604-811-8426604-1597466768463.jpg)
ग्रामसेवा मंडळाची स्थापना 1934 मध्ये विनोबा भावे यांनी केली. खेड्यात राहणाऱ्या नागरिकांना स्वावलंबनाचे धडे देण्यात आले. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार देण्यासाठी स्वतःच्या गरजा पूर्ण करणारे कापड तयार करण्याची चळवळ राबवण्यात आली. परदेशी कपडा आणि वस्तूंवर बहिष्कार टाकत स्वदेशीचा नारा देण्यात आला. या खादी निर्मितीतून प्रत्येकाच्या हाताला काम मिळाले. लोकांना स्वावलंबनाचा धडा देण्याचे काम ग्रामसेवमंडळाच्यावतीने करण्यात आले. त्या काळात ग्रामसेवा मंडळाचा डोलारा वाढत असताना गोपुरी परिसरात कामाचा विस्तार करून 1940 मध्ये कामाला गती देण्यात आली. भांडवलशाही न स्वीकारता प्रत्येक हाताला रोजगार मिळेल या तत्वावर काम केले जात आहे.
इंग्लंडमध्ये स्थायीक झालेल्या काही जणांनी खादीचे काम करणाऱ्या ग्रामसेवा मंडळासोबत संपर्क साधला. सुरुवातीला मास्क निर्यातीवर बंदी असल्याने खादीचा कापड निर्यात करून पाठवण्यात आला. कापडापासून मास्क शिवणे त्यांना आर्थिकदृष्ट्या सोयीचे नसल्याने त्यांनी मास्क शिवून देण्याची मागणी केली. पण मास्क कसे असावे, यासाठी काही माप ठरवण्यात आले. मास्कची ठराविक लांबी-रुंदी, तीन स्तर, कपडा खराब असू नये, या नियमांचे काटेकोर पालन करून शिवण्यात आले. हे मास्क शिवायला साधारण एक महिन्याचा कालावधी लागला. हे मास्क शिवताना जवळपास 20 ते 25 मिनिटांचा कालावधी लागतो. तेच इतर मास्क शिवायला 10 मिनिटे लागत असल्याचे खादीचे शिवणकाम करणारे गणेश खांडस्कर सांगतात.