वर्धा - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, अनलॉकनंतर आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. सध्या अनलॉकचा पाचवा टप्पा सुरू आहे. या सगळ्यात सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटूनही कलाकारांना कार्यक्रम घेण्यास परवानगी मिळाली नाही. मात्र, ज्यांचे पोट कलेवर आहे, त्यांच्यासमोर जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कार्यक्रमांना, संगीत शाळांना परवानगी देण्याची मागणी संगीत कलोपासक संघाने केली आहे. अन्यथा आत्महत्या करण्याची वेळ येईल, अशा शब्दांत कलाकारांची व्यथा मांडण्यात आली आहे. यासंंबंधित येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषद घेण्यात आली.
संचारबंदी सुरू होताच सामाजिक सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रम उपक्रमांद्वारे लोकांची गर्दी होऊ नये बंद करण्यात आले. मात्र, त्यामुळे कलाकारांना आर्थिक अडचणीना समोर जावे लागत आहे. कार्यक्रमांच्या माध्यमातून अर्थार्जन होत आहे. दुसरे माध्यम नसल्याने संसाराचा गाढा कसा ओढावा? हा प्रश्न आहे. कौटुंबिक अडचणींबरोबर मुलांच्या शिक्षणाचा, अन्नधान्याचा, पाणी, आदी अनेक समस्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे.