महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 10, 2019, 3:48 PM IST

Updated : May 10, 2019, 8:12 PM IST

ETV Bharat / state

'कौमार्य चाचणी' न्याय वैद्यक अभ्यासक्रमातून होणार हद्दपार, डॉ. खांडेकरांच्या लढ्याला यश

कौमार्य चाचणी हे अशास्त्रीय असून वैज्ञानिक नाही डॉ. इंद्रजीत खांडेकर ठामपणे सांगत होते. त्यांनी वयाच्या ३१ व्या वर्षी कौमार्य चाचणीविरोधात लढा सुरू केला होता. तब्बल ९ वर्षांनी त्यांच्या या लढ्याला यश आले आहे.

कौमार्य चाचणी

वर्धा - कौमार्य चाचणी हे वैद्यकीय पाठ्यक्रमातून वगळण्यात येणार आहे. ही कौमार्य चाचणी शास्त्रीय असल्याचा समज होता. मात्र, त्याविरोधात वर्ध्यातील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे प्राध्यापक डॉ. इंद्रजीत खांडेकर यांनी लढा सुरू केला होता. या लढ्याला तब्बल ९ वर्षांनी यश मिळाले आहे. हे यश जरी साधे वाटत असले तरी मागील १०० वर्षांपासून शिकवला जाणारा हा भाग आता वगळला जाणार आहे. त्यामुळे न्यायालयीन निकालावर मोठा परिणाम होणार आहे. तसेच महिलांचे होणारे लैंगिक शोषणही थांबणार आहे.

कौमार्य चाचणी' न्याय वैद्यक अभ्यासक्रमातून हद्दपार होणार आहे.

कौमार्य चाचणी हे अशास्त्रीय असून वैज्ञानिक नाही डॉ. इंद्रजीत खांडेकर ठामपणे सांगत होते. त्यांनी वयाच्या ३१ व्या वर्षी कौमार्य चाचणीविरोधात लढा सुरू केला होता. तब्बल ९ वर्षांनी त्यांच्या या लढ्याला यश आले आहे.

वैद्यकीय शास्त्र हे विज्ञानावर आधारीत असून प्रगत शास्त्र समजले जाते. याठिकाणी चालीरीतींना जागा नाही, असे सर्वांनाच वाटते. मात्र, यातीलच एक म्हणजे 'व्हर्जिनिटी टेस्ट' वैज्ञानिकतेला फाटा देणारी आहे. व्हर्जिनिटी टेस्ट हा धडा एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला न्यायवैद्यक शास्त्रात शिकवला जातो. याचाच डॉ. खांडेकर यांनी अभ्यास करून अशास्त्रीय तसेच अवैज्ञानिक असल्याचे सांगितले. या चाचणीबद्दल वैद्यकशास्त्रात कुठलेही संशोधन नसताना व्हर्जीनिटी टेस्ट करण्याचे आदेश न्यायालय सुद्धा देत होते.

न्यायालयाच्या आदेशाने कौमार्य चाचणी बलात्कारांच्या प्रकरणामध्ये केली जात होती. त्यासाठी वैद्यकीय अभ्यासक्रमात खरी कुमारी, खोटी कुमारी याचे काही निकष दिले आहे. हे निकष अवैज्ञानिक आणि अशास्त्रीय आहे. कारण व्यक्तिनिरुप हे निष्कर्ष बदलतात. त्यामुळे याचा परिणाम निकालावर पडत असे. यावर डॉ. खांडेकर यांनी संशोधन करून एक अहवाल राज्य सरकार आणि केंद्र सरकार सोबतच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला पाठवला होता.

यामध्ये हे चाचणी कशाप्रकारे अवैज्ञानिक आहे हे सिद्ध केले. त्यामुळे बलात्कार पीडीतेसोबत केली जाणारी ही टेस्ट २०१३ मध्ये बंद करण्यात आली. मात्र, जात पंचायत, घटस्फोट, विवाह संबंधात या चाचणीचा उपयोग होत असे. त्यामुळे अन्याय थांबलेला नव्हता. यासाठीच आता त्याला मान्यता देणाऱ्या अभ्यासक्रमातूनच हा विषय काढण्याचा मार्ग पकडत डॉ. खांडेकर यांनी नव्याने सुरुवात केली. पुन्हा ४ ते ५ वर्षे काम करून डिसेंबर २०१८ मध्ये एक अहवाल तयार केला. हा अहवाल भारतीय वैद्यक परिषद, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे पाठवला. यावर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यपीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी हा अहवाल अभ्यासक्रम समितीपुढे ठेवण्याचे आश्वस्त केले होते.

अभ्यासक्रम मंडळाच्या बैठकीत ठराव मंजूर -
अखेर एप्रिल २०१९ मध्ये नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अभ्यासक्रम मंडळापुढे हा ठराव ठेवण्यात आला. या समितीचे अध्यक्ष डॉ. रामानंद भर्मा, तसेच डॉ. हेमंत गोडबोले, डॉ. संदीप कडू यांनी या अहवालाला समजून घेतले. तसेच हा 'व्हर्जिनिटी टेस्ट' चा भाग अभ्यासक्रमातून काढण्याचा ठराव सर्वानुमते घेतला. यासाठीचे एक अकॅडमीक करिकुलम कमिटीकडे दिले जाईल. त्यानंतर एक नोटिफिकेशन काढून पुढे ही प्रक्रिया सुरू केली जाईल.

महाराष्ट्र वैद्यकीय मंडळाने ठराव केला मान्य, देशभरात लागू करण्यासाठीही प्रयत्न

केवळ महाराष्ट्र वैद्यकीय मंडळाने हा ठराव मान्य केला आहे. त्यामुळे देशभरात हा अहवाल मान्य करण्याचे काम बाकी आहे. तसेच अनेक प्रगत देशामध्ये सुद्धा हा भाग अजूनही आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे कौमार्य चाचणी वगळणारे पहिले राज्य असेल, असे डॉ. इंद्रजीत खांडेकर यांनी ईटीव्ही सोबत बोलताना सांगितले.

बलात्कार पिडितांच्या केसमध्ये टू फिंगर टेस्ट केल्या जात असे. त्यामुळे दोन बोटाने केली जाणारी ही चाचणी वेगवेगळे निरीक्षक दर्शवत होते. त्यामुळे हे शास्त्रीय नाही, असे सांगणारा 258 पानांचा अहवाल जो न्यायालयाने 75 बलात्काराच्या केसचा अभ्यास करून तयार केला. यावर २०१३ मध्ये गाईडलाईन आली. ज्यामुळे महाराष्ट्रात 10 मे 2013 मध्ये ही चाचणी बंद झाली. पुढे ४ डिसेंबर २०१४ मध्ये केंद्रात लागू होत ही चाचणी बंद झाली. २०१६ पासून बदल अभ्यासक्रमात समाविष्ट झाला.

न्यायालयाच्या निर्णयाचे करावे लागले अवलोकन -
कुटुंब घटस्फोट प्रकरणात न्यायालय चाचणीचे आदेश देत होते. त्याला व्हर्जिनिटी टेस्ट या नावाने संबोधले जाते. म्हणून ६२ न्यायालयीन निकालाची तपासून नवीन अहवाल हा अभ्यासक्रम मंडळाकडे पाठवला. अखेर 100 वर्षपासून शिकवला जाणारा भाग ज्याला शास्त्रीय पूरावा नव्हता ती टेस्ट आता हद्दपार होणार.

वर्ध्याच्या छोट्याश्या गावाची महात्मा गांधी यांच्यामुळे जागतिक पातळीवर ओळख निर्माण झाली. त्यांच्याच नावाने असणाऱ्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे प्राध्यापक डॉ. इंद्रजीत खांडेकर यांनी वैद्यकीय शास्त्रातील अभ्यासक्रमात सुचवलेला बदल ऐतिहासिक नोंद करणारा आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Last Updated : May 10, 2019, 8:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details