वर्धा- महाराष्ट्र असो की केंद्र सरकार असो प्रत्येक योजना प्रत्येक घरात पोहचल्या पाहिजे. समाजातील शेवटच्या घटकाला लाभ मिळाला पाहिजे. बाबासाहेबांच्या घटनेनुसार सर्वांना जगण्याचा समान अधिकार आहे. यादेशात विरासत संस्कृती टिकली पाहिजे आणि बिरसा मुंडा यांच्या जीवन चरित्राच्या आधारावर समाज निर्माण झाला पाहिजे असे राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे म्हणाले. अनके वर्षांपासून प्रलंबित असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, आदिवासी बांधवांना शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी नागपूरला जावे लागत होते. यामुळे भाजपला निवडून देत मताच्या दानाचे भान राखून वर्धा जिल्हयासाठी आदिवासी प्रकल्प कार्यालय नव्याने सुरु केले आहे. हे कार्यालय सुरु होण्यासाठी आदिवासी बांधवांचे मोठे योगदान आहे. तसेच आमदार पंकज भोयर यांच्या पाठपुराव्याने हे शक्य झाल्याचे म्हणत त्यांनी कौतूक केले. यापुढेही आदिवासींसाठी शासन सर्वतोपरी काम करेल असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.