महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 28, 2019, 10:00 PM IST

ETV Bharat / state

वर्धा येथे 104 एकरवरील शंभर कोटींच्या मुरुमाची चोरी, समृद्धीच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग भाग दोनचे काम हे अ‌ॅपकॉन कंपनीला दिले आहे. तसेच पेटी कंत्राटदाराच्या माध्यमातून सुद्धा काम सुरू आहे. यात सेलू पोलीस ठाण्याअंतर्गत कोझी कंपनीची 1 हजार एकर जमीन आहे. यातील 64 एकर जमिनीवर अवैधरित्या कुठलीही परवानगी न घेता खोद काम करत मुरुम काढला.

शंभर कोटींच्या मुरुमाची चोरी

वर्धा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाचे कंत्राटदार आणि उपकंत्राटदारावर बेकायदेशीर मुरुम उत्खननाचा गुन्हा सेलू पोलिसांत दाखल करण्यात आला. यात कोझी कंपनी आणि शेतकऱ्यांची मिळून 104 एकर जमिनीवरील मुरुम ज्याची किंमत 100 कोटींच्या घरात असल्याचे बोलले जात आहे.

104 एकरवरील शंभर कोटींच्या मुरुमाची चोरी प्रकरण
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग भाग दोनचे काम हे अ‌ॅपकॉन कंपनीला दिले आहे. तसेच पेटी कंत्राटदाराच्या माध्यमातून सुद्धा काम सुरू आहे. यात सेलू पोलीस ठाण्याअंतर्गत कोझी कंपनीची 1 हजार एकर जमीन आहे. यातील 64 एकर जमिनीवर अवैधरित्या कुठलीही परवानगी न घेता खोद काम करत मुरुम काढला. यासह शेतकऱ्यांच्या जमिनीवरील ही मुरुम खोदण्यात आला, अशी तक्रार सेलू पोलिसांत देण्यात आली.ऍफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरला नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाचे 59 किमी बांधकाम कंत्राट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मिळाले आहे. एकूण 3 हजार 220 कोटींचे हे काम असून 59 किमींचा टप्पा वर्धा जिल्ह्यात आहे. कोझी प्रॉपर्टीजची वर्धा जिल्ह्याच्या केळझर ते गणेशपूर येथे एक हजार एकर जमीन असून समृद्धी महामार्गाचा जवळपास 1.50 किमींचा भाग मालकीच्या जमिनीवरुन जातो. 63 एकर जमीन सेलू तर 40 एकर सिंदी पोलीस स्टेशन अंतर्गत येते. या चोरीची तक्रार कोझी प्रॉपर्टीजने जिल्हाधिकारी व ठाणेदार सेलू पोलीस ठाण्यात दिली आहे. या जमिनीतून 20 लाख ब्रास मुरुम चोरला असून त्याची किंमत जवळपास शंभर कोटी असल्याचे सांगितले जात आहे.


समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. यामुळे या कामात हस्तक्षेत करू नका असा दम शेतकरी राजेश जयस्वाल यांना देण्यात आला. यावेळी माझ्या जमिनीवर उत्खनन करण्याचा अधिकार कोणी दिला, असे विचारले असता जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचे पत्र दाखवण्यात आले. या पत्रात केवळ नदीतील गाळ काढण्याचा परवाना दिला आहे. मात्र, मुख्यमंत्री यांचा प्रोजेक्ट असल्याचे समोर करुन आपले कोण काय बिघडवणार, असा आभास दाखवत मोठ्या प्रमाणत उत्खनन केले आहे. मात्र, शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल उपस्थित होत आहे.


कोझी प्रॉपर्टीचे व्यवस्थापक निलेश सिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ऍफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा अधिकारी, उपकंत्राटदार कंपनी एमपी कन्स्ट्रक्शन सेलू येथे अरुण कुमार आणि आशिष दफतरी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू करण्यात आला असून या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती ठाणेदार काटकर यांनी दिली.


या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे आल्यानंतर दोन अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली. यामध्ये झालेले उत्खनन आणि कंपनीचे काम हे उपविभागीय अधिकारी आर्वी आणि वर्धा याच महसूल क्षेत्रात सुरू असल्याने अधिकारी चौकशी करुन अहवाल सादर करतील. यानंतर अहवालात काय निष्पन्न होईल यावरुन पुढील कारवाईची तरतूद केली जाईल, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान खान यांनीं ईटीव्ही भारत सोबत बोलतांना दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details