महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 28, 2020, 5:56 PM IST

Updated : Aug 28, 2020, 10:52 PM IST

ETV Bharat / state

'पोखरा प्रकल्पाच्या कामावर मुख्यमंत्र्यांची नाराजी'

शेतकऱ्यांकडे जाऊन संवाद साधणे, मार्गदर्शन करून त्यांच्या अडचणी सोडवणे हे कृषी विभागाचे खरे काम आहे. मात्र सध्या कृषी विभाग केवळ टारगेट ओरिएंटेड काम करत असल्याचे खडे बोल मंत्री भुसे यांनी सुनावले.

project
कृषी मंत्री दादाजी भुसे

वर्धा - जिल्ह्यात सुरू असलेल्या पोखरा प्रकल्पाचे कामकाज समाधानकारक नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. प्रकल्पाची प्रगती पुढील एक महिन्यात समाधानकारक नसल्यास अधिकार्‍यांवर कारवाईचा इशारा कृषिमंत्री दादा भुसे यांनी बैठकीत दिला आहे.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात कृषी विषयक आढावा बैठकीला कृषी मंत्री दादा भुसे आले होते. यावेळी शेतकऱ्यांसाठी असलेल्या पोखरा प्रकल्पातील कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यात मागील तीन वर्षाच्या कार्यकाळात झालेले कामे हे समाधानकारक नसल्याने कृषी मंत्री यांनी नाराजी व्यक्त केली. "आपण स्वतः शेतकऱ्यांची मुले आहात, शेतकऱ्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याची चांगली संधी आपल्याला मिळाली आहे. आपण केलेल्या कामावर आपण स्वतः समाधानी आहात का ?याचा जरा विचार करा". असा प्रश्न अधिकाऱ्याना करत कामकाजात लक्ष देण्याचा सूचना त्यांंनी दिल्यात.

शेतकऱ्यांकडे जाऊन संवाद साधणे, मार्गदर्शन करून त्यांच्या अडचणी सोडवणे हे कृषी विभागाचे खरे काम आहे. मात्र सध्या कृषी विभाग केवळ टारगेट ओरिएंटेड काम करत असल्याचे खडे बोल मंत्री भुसे यांनी सुनावले. पुढील चार वर्षात पोखरा प्रकल्प संपणार आहे. मोठ्या प्रमाणात काम होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पाला स्मार्ट योजनेची जोड दिल्यास मोठ्या प्रमाणावर शेती प्रक्रिया उद्योग उभे राहतील. पण त्यासाठी नियोजनपूर्ण काम करण्याच्या सूचना करण्यात आल्यात. या प्रकल्पासंदर्भात गावातील नोंदणी प्रक्रिया वाढवावी, अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्रामुख्याने सामावून घ्यावे, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्याही नोंदणीवर भर द्यावी असेही त्यांनी सांगितले.

कृषी विभागाच्या कामावर नाराजी...

सोयाबीन पिकावर आलेल्या रोग पाहता झालेले काम सुद्धा नाराज करणारे आहे. यावेळी कृषी विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शेतीशाळा, क्रॉपसॅप, निरीक्षण दौरे, अधिका-यांनी केले असते तर शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन वेळीच मिळाले असते. आज झालेले शेतकऱ्यांचे नुकसान टाळता आले असते असेही कृषी मंत्री भुसे म्हणाले

जे विकेल तेच पिकेल याकडे लक्ष द्या.

जे विकलं जातं ते पिकवले गेले पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांना समावून घेत मार्गदर्शन करणे काळजी गरज आहे. उत्पादकता कशी वाढेल? जास्तीचे दोन पैसे कसे मिळतील?. शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत कसा पोहचेल? यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबविण्याचेही सांगितले. जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करून खताचा, रासायनिक खताचा कमी वापर करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे असे मंत्री भुसे यांन सांगितले.

यावेळी त्यांनी पीक कर्ज वाटपाबाबत समाधान व्यक्त केले. आजपर्यंत 48 हजार 188 शेतकऱ्यांना 486 कोटी 47 लक्ष रुपये कर्जवाटप झाले आहे. मागील वर्षी 37 टक्के कर्ज वाटप झाले होते त्या तुलनेत यावर्षी 52 टक्के कर्ज वाटप झाले असले तरी कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार कर्ज वितरण करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बैठकीला आमदार रणजित कांबळे, आमदार समीर कुणावर जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे, कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे आदीजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कृषी संदर्भात सादरीकरण केले. बैठकीला तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी उपस्थित होते.

Last Updated : Aug 28, 2020, 10:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details