महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 14, 2019, 5:44 PM IST

Updated : May 15, 2019, 12:19 AM IST

ETV Bharat / state

आरोग्यवर्धक लग्नपत्रिका : पर्यावरण संवर्धनासाठी निमंत्रण पत्रिकेसोबत शेवग्याच्या बिया

लग्न म्हटलं की अनेक बाबी असतात. यात लग्नपत्रिका तर आलीच. चांगल्या पत्रिकेची निवड करणे म्हणजे जरा कसरतीचा भाग, हे डिजाईन, ते डिजाईन आणि बरंच काही. महाग नको स्वस्त नको, जास्त महाग नको बरं...पण जर घरो-घरी पोहोचलेली पत्रिका आरोग्यवर्धक असेल तर... हो वर्ध्याच्या बरबडी येथील केळवतकर कुटुंबात लग्न आहे. त्यांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका ही सामाजिक संदेशासह आरोग्यवर्धक ठरणार. पण यासाठी तुम्हाला थोडी वृक्ष लागवडीची तसदी घ्यावी लागणार.... चला तर पाहू ही आगळी वेगळी पत्रिका

वर्धा

वर्धा - बरबडी इथल्या केळवतकर कुटुंबीयांकडे सध्या लग्नाची धामधुम सुरू आहे. हे लग्न स्मरणात राहावे म्हणून सगळे एक आरोग्य-धनसंपदा देणारे गिफ्ट पत्रिकेसोबत जोडत आहेत. ही पत्रिका आहे पूनमच्या विवाहाची. १९ मे रोजी अशोकनगर येथील नीरज महादेव मोटघरे यांच्यासोबत होणाऱ्या विवाहाची. या विवाहाचे वैशिष्ट्य म्हणजे पत्रिकेसोबत तांदळाच्या अक्षतेऐवजी शेवग्याच्या बिया दिल्या जाणार आहेत. यात आरोग्यवर्धक शेवग्याच्या बियांसोबत ’एक पाऊल स्वच्छतेकडे’, ’बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ’सारे शिकुया, पुढे जाऊया’, ’जंगल वाचवा, देश वाचवा’ असे महत्त्वपूर्ण संदेश पत्रिकेत देण्यात आले आहेत.

वर्धा
लग्न अविस्मरणीय व्हावे म्हणून पूनम आणि निखिल केळवतकर या बहीण भावांनी आगळी वेगळी संकल्पना मांडली आहे. केवळ संदेश पत्रिकेत लिहून न ठेवता पत्रिकेसोबत शेवग्याच्या बिया देऊन प्रत्यक्षात उतरवायला पाऊल टाकले आहे. यामुळे सामाजिक संदेशाने भरलेली ही पत्रिका सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

शेवगाच का?

पत्रिकेसोबत शेवग्याचे बियाणे देण्याचे कारण म्हणजे शेवग्याची कमी पाण्यात लागवड होत असून आयुर्वेदीकदृष्ट्या शेवग्याचे महत्त्व असल्याने शेवग्याची निवड केल्याचे पूनम यांचे भाऊ निखिलेश यांनी सांगितले.

व्यवसायाने शेतकरी असलेल्या केळवतकर कुटुंबातील सगळेच शिक्षित आहेत. मधुकर केळवतकर हे ग्रामपंचायत सदस्य असून घरी राजकरणासोबत समाजकारणही आहे. त्यांची पत्नी अंगणवाडी सेविका असल्याने सर्व शिक्षा अभियानाचे महत्व पत्रिकेत अधोरेखित केले आहे. पूनम बीए डीटीएड असून भाऊ निखिलेशचे एमएस्सी कृषीचे शिक्षण झाले आहे. कृषी तंत्र निकेतनमध्ये संशोधक असल्याने झाडांचे ज्ञान त्याला अधिकच आहे. त्यामुळे पर्यावरणाबाबत तळमळ, वृक्ष लागवड आणि संवर्धन त्यातून दिसते.

मुलांनी पर्यावरण संवर्धन, सामाजिक संदेश देत दाखविलेल्या जागरूकतेचे पत्रिका मिळणाऱ्या नातेवाईकांनी कौतुक केले. पत्रिका छापून अडगळीतच पडून असतात. तांदळाचे दाणे फेकले जातात, अशा परिस्थितीत ही संकल्पना भारी ठरल्याचा आनंद त्यांच्या वडिलांनी व्यक्त केला. एवढंच नव्हे तर केळवतकर कुटुंबीयांकडून देण्यात येणाऱ्या पत्रिकेसोबतच्या बियांची लागवड नागरिक करतही आहेत. त्यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक नातेवाईकांसह गावकरीही करत आहेत.

लग्न समारंभात वर-वधूंना भेट वस्तू देण्याची प्रथा आहे. मात्र, या लग्न पत्रिकेतून दिल्या जाणाऱ्या शेवग्याच्या बिया चांगले आरोग्य देणाऱ्या आहेत. त्यामुळे या बियांपासून झाडांची लागवड आणि संरक्षण होईल. पण, फलस्वरुपात भविष्यात 300 च्या वर आयुर्वेदिक गुणधर्म असलेले झाड कायमची भेटवस्तू म्हणून तुमच्या अंगणात पूनम आणि नीरजच्या लग्नाची आठवण नक्की करून देईल यात शंका नाही.

शेगवग्यामध्ये औषधी गुणधर्म जास्त, लावायला सोपे

शेवग्याच्या शेंगा आरोग्यवर्धक आहेत, सर्वत्र वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे झाडे लावण्याचा उद्देश या माध्यमातून ठरला. यात मग झाड निवडायचे झाल्यास शेवगा हा अगदी कमी पाण्यात सहज उगवण क्षमता असलेले झाड आहे. शेवगा आरोग्याला अनेक फायदे मिळवून देणारा आहे. प्रत्यके पत्रिकेसोबत चार ते पाच बिया दिल्या जात आहेत. शेवग्याच्या 100 ग्रॅम पाल्यात दह्यापेक्षा 9 टक्के प्रोटीन जास्त असतात. संत्र्यापेक्षा जास्त 7 टक्के व्हिटॅमिन सी, गाजरापेक्षा जास्त व्हिटामिन ई आहे. दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असल्याचे निखिल केळवतकर सांगतात. त्यामुळे आयुर्वेदानुसार याचे आपल्या आरोग्याला 100 पेक्षा जास्त फायदे आहेत.

संकल्पना ऐकताच मोफत मिळाले बियाणं

यवतमाळ येथील पद्मा अॅग्रो कंपनीकडून हे बियाणे मोफत देण्यात आले. या संकल्पनेचा फायदा लक्षात घेता. 800 पत्रिकेसोबत देता येईल एवढे बियाणे मोफत उपलब्ध झाल्याने चांगली मदत झाल्याचे निखिल आणि पूनम तसेच केळवतकर कुटुंबीय सांगतात.

Last Updated : May 15, 2019, 12:19 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details