महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 14, 2019, 11:20 AM IST

ETV Bharat / state

मलनिस्सारणाच्या कामावरील ट्रॅक्टरच्या धडकेत 11 वर्षीय बालकाचा मृत्यू

शहरात मलनिस्सारणाच्या कामावर आलेल्या ट्रॅक्टरच्या धडकेत एका 11 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर ट्रॅक्टरचालक घटनास्थळावरून पसार झाला असला तरीही पोलिसांना अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

अपघात स्थळ

वर्धा - शहरात वर्षभरापासून केंद्र शासनाच्या 'मलनिस्सारण भूमिगत गटार योजनेचे' काम सुरू आहे. या कामावर आलेल्या एका ट्रॅक्टरच्या धडकेत 11 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी शहरातील गांधीनगर परिसरात घडली. यावेळी जखमी बालकाला नागरिकांनी उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आदित्य बैस असे मृत बालकाचे नाव आहे. ट्रॅक्टर चालक या घटनेनंतर पसार झाला आहे.

शहरातील विविध भागात मलनिस्सारण योजनेचे काम सुरू आहे. भूमिगत मलनिस्सारणाच्या कामासाठी जागोजागी सिमेंटचे रस्ते खोदण्यात आले आहेत. या प्रकारामुळे शहरात अपघाताची मालिकाच सुरू आहे. आज सायंकाळी वाणे यांच्या दवाखान्याजवळ मलनिस्सारण योजनेच्या कामावर ट्रॅक्टर आला होता. यावेळी घटनास्थळावरून 11 वर्षीय आदित्य बैस हा सायकलने जात होता. एवढ्यात ट्रॅक्टरने चिमुकल्याच्या सायकलला जोरदार धडक दिली. यात आदित्य गंभीररीत्या जखमी झाला. ट्रॅक्टरचालक मात्र, लगेच घटनास्थळावरून पसार झाला. नागरिकांनी आदित्यला उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल केले. गंभीररित्या जखमी झालेल्या आदित्यला पुढील उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त नागरिकांनी ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे.

अपघात स्थळ

मागील वर्षभरापासून शहरात या योजनेची कामे सुरु आहेत. या अंतर्गत शहरात ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. या खोदलेल्या खड्ड्यात पडून अनेक अपघात गेल्या वर्षभरात घडले असलेत तरीही प्रशासनाने नेहमीच त्याकडे दुर्लक्ष केले आहे. पण, यावेळी मात्र हा हलगर्जी पणा एका बालकाच्या मृत्यूला जबाबदार ठरला आहे. याजनेच्या कामासाठी कंत्राटदारांकडून अनेक वाहने वापरली जातात. मात्र, या वाहनांवर नंबरप्लेट आढळून येत नाहीत. यामुळे हा गुन्हा नेमका कोणावर दाखल करायचा हा प्रश्न पोलिसांना पडलेला आहे. तरी देखील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

कंत्राटदार, नगराध्यक्ष, आणि नगर पारिषदेच्या मुख्याधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

ही विकास कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी वारंवार केली होती. तरीसुद्धा शासनाने याकडे दुर्लक्ष केले. शहरात दररोज अपघाताच्या घटना घडत असतास. यात आता 11 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू या घटनेची वाढ झाली आहे. यासाठी कंत्राटदार, नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी केली. शहरात विकासाच्या नावावर जर लोकांचे जीव जात असतील तर या विकासाचा फायदा कोणाला होणार? असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी विचारला. ईटीव्हीशी बोलतांना त्यांनी लवकरात लवकर कारवाई करत , गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details