ठाणे- भारतात कोरोना महामारीचे संकट अद्यापही सुरू असतानाच 'म्युकरमायकोसिस'चे (Mucormycosis) या काळ्या बुरशीजन्य संसर्गाच्या संकटाने शिरकाव केला आहे. देशभरात या जीवघेण्या रोगाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने या रोगाचा साथरोग नियंत्रण कायद्यामध्ये समावेश केला आहे. करोना संकटादरम्यान देशात 'काळी बुरशी' अर्थात 'म्युकरमायकोसिस'चे आत्तापर्यंत तब्बल ८८४८ रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण गुजरात राज्यात आढळल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे. यापैंकी २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या रोगाबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने नेमलेल्या टास्क फोर्सकडून माहिती देण्यात आली आहे.
ब्लॅक फंगस हा संसर्गजन्य रोग नाही-
याबाबत टास्क फोर्सचे सदस्य संजय ओक सांगतात, म्युकरमायकोसिस आजार ही महामारी आहे, असे आपण तेव्हाच म्हणू शकतो. जेव्हा कमी वेळात जास्त रुग्ण दगावले जातात. अशा रोगाचा संसर्ग देखील मोठ्या प्रमाणात वाढत जातो. म्हणून महाराष्ट्रात अजून तरी ब्लॅक फंगस महामारी म्हणून घोषित केलेली नाही. ब्लॅक फंगस हा संसर्गजन्य रोग नाही, कोविड झालेल्या नागरिकांना हा रोग होण्याची शक्यता आहे. कोविडचा परिणाम देखील म्हणून आपण याकडे पाहू शकतो. या रोगासाठी देखील टास्क फोर्सने वेगळी नियमावली राज्य सरकारला दिलेली आहे. आपण काळजी घेतली तर या रोगाला देखील रोखू शकतो.