ठाणे : सुप्रसिद्ध वाघेला टी डेपोवर अन्न आणि औषध प्रशासनातर्फे धाड टाकण्यात आली आहे. वाघेला यांच्या चहा पावडरमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असल्याने, चहा पिणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊन कॅन्सरही होऊ शकतो. अशी तक्रार ठाण्यातील सामाजिक कार्यकर्त्या शशी अगरवाल यांनी केली होती. त्याआधारे धाड टाकण्यात आली असून जवळपास आठ लाखांचा माल सील करण्यात आला आहे. तसेच चहाचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अशीच धाड 2018 साली देखील टाकण्यात येऊन तब्बल 1080 चहाचे पॅकेट एफडीए तर्फे सील करण्यात आले होते.
अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार: ठाण्यातील चहाप्रेमींमध्ये वाघेला चहाला मोठी मागणी असून गेली अनेक वर्षे चहाप्रेमी या चहाचा आस्वाद घेत आहेत. मुख्य बाजारपेठेत असलेल्या भव्य दुकानातून दररोज मोठ्या प्रमाणात चहाची विक्री होते. तसेच वाघेला नाव सर्वांच्या पसंतीचे ठरले आहे. वाघेला चहा कंपनी चहाची पाने आसाम आणि पश्चिम बंगाल येथून मागवते. त्यावर प्रक्रिया करून ते पॅकिंगमध्ये विकले जाते. परंतु ठाण्यातील सामाजिक कार्यकर्त्या शशी अग्रवाल यांनी या चहा पावडरमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याची तक्रार अन्न आणि औषध प्रशासनाकडे केली होती.
चहा पावडरमध्ये जास्त भेसळ : एफडीए आणि fssai ने घालून दिलेल्या 100 ppm च्या मर्यादेपेक्षा कैक पटींने जास्त भेसळ होत असल्याचा निकाल, एका खाजगी प्रयोगशाळेने दिल्यानंतर शशी अगरवाल यांनी याबाबतची तक्रार एफडीएकडे केली होती. शशी अगरवाल या देखील वाघेला चहा मधूनच चहा पावडर विकत घेत होत्या. परंतु काही काळाने त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी डॉक्टरांकडे धाव घेतली. दर दिवशी केवळ दोन कप वाघेला चहा पिल्याने पुढे कॅन्सरचा धोका होऊ शकतो असे धक्कादायक विधान डॉक्टरांनी केले.