ठाणे - "कोणताही डामडौल न करता साध्या पद्धतीने ठाण्यातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी प्रस्थापितांना हरविण्यासाठी ही लढाई अत्यंत गंभीरपणे लढणार आहोत. वंचित जनतेला सत्ता, संपत्ती, न्याय, शिक्षण, विकास आणि संविधानातील हक्क व अधिकार मिळावेत म्हणून ही लढाई लढत आहे," असे उन्मेष बागवे यांनी आज उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सांगितले.
हेही वाचा-जोरदार शक्तीप्रदर्शन करत आदित्य ठाकरेंचा उमेदवारी अर्ज दाखल, ठाकरे कुटुंबीय उपस्थित
आज दुपारी बारा बाजता इंदिरानगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांनी पदयात्रा काढली. ही पदयात्रा रोड नं ३३, सी पी तलावमार्गे, रामनगर आयटीआयमार्गे काढण्यात आली. या पदयात्रेत भारीपा शहर अध्यक्ष महेंद्र अंभोरे, लोकसभा संघटक मोहन नाईक, कोपरी पाचपाखाडी अध्यक्ष प्रवीण गायकवाड, लोकसभा महासचिव जयवंत बैले, उमेदवार प्रतिनिधी मंगेश खातू व सुभाष ठाकरे यांच्यासह पन्नास कार्यकर्ते हजर होते.
हेही वाचा-राज्यात भाजप व शिवसेनेच्या विरुद्ध जनतेचा मोठा क्रोध : दिलीप वळसे-पाटील
'मी जर जनतेची कामे केली नाहीत, अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, पक्षांतर केले, भ्रष्ट आचरण केले किंवा संविधानातील तरतुदींच्या विरोधी काम केले तर जनतेने मला परत बोलवावे. त्यासाठी मी बिन-तारखेचे राजीनामा पत्र ठाण्याच्या प्रतिष्ठीत व जाणकार व्यक्तींचा समावेश असलेल्या सिटीझन कमिटी कडे दिले आहे,' असे बागले यांनी सांगितले. 'बिन-तारखेचे राजीनामा पत्र आपल्याकडे दिले' असल्याचे सिटीझन कमिटीचे प्रवक्ते गिरीश भावे यांनी सांगितले.