ठाणे- शहरातील 148 तर, ठाणे आणि मुंब्रा-कळवा मतदारसंघातील 149गोविंदा पथकांनी जितेंद्र आव्हाड आणि अविनाश जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्र ही सण, उत्सवांची भूमी आहे. या भूमितील सण, उत्सव साजरे झालेच पाहिजेत. मात्र, दहिहंडीच्या उत्सवावर निर्बंध आणले जात आहेत. त्यामुळे या दोघांच्या विजयासाठी कितीही 'थर' लावण्यास तयार आहोत, अशी भूमिका गोविंदा पथकांनी घेलली.
यावेळी गोविंदा पथकाच्या प्रमुखांनी सांगितले की, आनंद दिघे यांनी दहिहंडीची परंपरा येथे रुजवली. त्यानंतर मराठी मातीतील हा सण सातासमुद्रापार नेण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी परिश्रम घेतले. आमच्या सारख्या मध्यमवर्गीय तरुणांना स्पेनच्या कॅसलर्स बरोबर ताठ मानेने उभे केले. मात्र, न्यायालयाच्या आदेशाने या मराठी मातीतील खेळावर निर्बंध आले. त्या विरोधात आव्हाड आणि अविनाश जाधव यांनी लढा दिला. जितेंद्र आव्हाड यांच्या साथीने दहिहंडी आणि गोविंदा पथकांमधील ऊर्जा जीवंत ठेवण्याचे काम अविनाश जाधव हे करत आहेत. न्यायालयाने लादलेले कडक निर्बंध आणि ते न पाळल्यास दाखल होणारे गुन्हे याची तमा न बाळगता जाधव हे नौपाड्यात दहिहंडीची उभारणी करून गोविंदा पथकांना जिवंत ठेवत आहेत. ते कोणत्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतात याच्याशी गोविंदा पथकांना काही देणं-घेणं नाही. ते आमच्यासाठी लढतात, मराठी सण आणि संस्कृती टिकवण्यासाठी लढतात, हे महत्वाचे आहे.
म्हणूनच आम्ही सर्व गोविंदा पथके अविनाश जाधव आणि जितेंद्र आव्हाड यांच्या पााठीशी उभे राहिलो आहोत. आमचा पाठिंबा हा केवळ दिखाव्याचा नाही, तर आम्ही सर्व गोविंदा प्रचारासाठी बाहेर पडणार आहोत. या दोघांच्या विजयासाठी परिश्रमाचे कितीही थर लावण्याची आमची तयारी आहे. मराठी सण वाचविण्यासाठी अविनाश जाधव यांच्या पाठीशी तमाम मराठीजण उभे राहतील, असा विश्वासही यावेळी गोविंदा पथकाच्या प्रमुखांनी व्यक्त केला.