महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 16, 2019, 2:37 PM IST

Updated : Nov 16, 2019, 3:01 PM IST

ETV Bharat / state

जीपच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू; वाहतूक पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाल्याचा स्थानिकांचा आरोप

बोलेरो जीपच्या धडकेत विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भिवंडी - पारोल मार्गावरील नदीनाका परिसरातील केमिसती प्रोसेस या कंपनीच्या समोर घडली आहे. वाहतूक पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे या विद्यार्थ्याचा जीव गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. अंकित केशरी गुप्ता असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

जीपच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

ठाणे- बोलेरो जीपच्या धडकेत विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भिवंडी - पारोल मार्गावरील नदीनाका परिसरातील केमिसती प्रोसेस या कंपनीच्या समोर घडली आहे. वाहतूक पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे या विद्यार्थ्याचा जीव गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. अंकित केशरी गुप्ता असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करत जीप चालकाला ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा -रेशनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 200 पोती तांदूळ जप्त

भिवंडी - पारोल मार्गावर नदीनाका येथील केमिसती प्रोसेस या कंपनीच्या रस्त्याच्या दुतर्फालगतच पाण्याचे अनेक टँकर उभे असतात. यामुळे भागात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. आज दुपारी अंकित हा विद्यार्थी शाळेत जात होता. त्यावेळी रस्त्याच्या कडेला उभे असलेले टँकर भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो चालकाला न दिसल्यामुळे जीपवरील ताबा सुटल्याने कडेला उभा असलेला अंकित याला चिरडून जीप टँकरवर जाऊन आदळ्याने हा अपघात झाला आहे.

हेही वाचा -ठाण्यात अर्धवट गाडीच्या नंबरवरून पोलिसांनी लावला दागिन्यांचा शोध

डाईंग कंपनीच्या प्रोसेससाठी लागणाऱ्या पाणीपुरवठ्याचे काम या रस्त्यावर उभ्या असलेल्या टॅंकरद्वारे केले जाते. या अपघाताच्या घटनास्थळी रोज वीस ते पंचवीस टँकर रस्त्याच्या दुतर्फा उभे असतात. यामुळे याठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. याच मार्गावर पुढे असणाऱ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना जाण्यासाठी हाच मार्ग असल्याने, या रस्त्यावर नेहमीच अवजड वाहने असतात. त्याबरोबर या टँकरचालकांकडे लायसन्स, गाडीची कागदपत्रे नसल्याने वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. तसेच वाहतूक पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच आज एका शाळकरी विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे, असा आरोपही स्थानिक नागरिकांनी केला आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती परिसरात पसरताच येथील नागरिकांनी रस्ता रोको करत टँकरचालकांना मारहाण केली. तर, येथे उभ्या राहणाऱ्या टँकरवर वाहतूक पोलिसांकडून योग्य ती कारवाई अगोदरच केली असती तर आज या विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला नसता. याठिकाणी मोठ्या प्रमाणात नादुरुस्त वाहने, टँकरची आवाजावी असल्याने वाहतूक पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे आतापर्यत अनेक अपघात या परिसरात होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.

Last Updated : Nov 16, 2019, 3:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details