महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sarpanch Bribery Case: कंपनीचे होर्डिंग लावण्याकरिता सरपंचाने मागितली लाच; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

कंपनीचे होर्डिंग लावण्याकरिता ठेकेदाराकडे सरपंच रेश्मा पाटील यांनी २७ जुलै २०२३ रोजी दीड लाखांची मागणी केली होती; या प्रकरणी सरपंचासह तिचा पती व एक ग्रामपंचायत सदस्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. तिघांवर ठाणे जिल्ह्यातील नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरपंच रेश्मा पाटील, पती सदानंद पाटील, ग्रामपंचायत सदस्य आकाश जनार्दन म्हात्रे, अशी गुन्हा दाखल झालेल्या लाचखोरांची नावे आहेत.

By

Published : Aug 11, 2023, 10:27 PM IST

Sarpanch Bribery Case
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

ठाणे: केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या भिवंडी तालुक्यातील दिवे (अंजूर) ग्रामपंचायतीच्या सरपंचासह तिचा पती व एक ग्रामपंचायत सदस्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. याप्रकरणी तिघांवर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे; मात्र गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच तिन्ही आरोपी फरार झाले आहेत. सरपंच रेश्मा पाटील, पती सदानंद पाटील, ग्रामपंचायत सदस्य आकाश जनार्दन म्हात्रे, अशी गुन्हा दाखल झालेल्या लाचखोरांची नावे आहेत.

दीड लाखाच्या लाचेची मागणी:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार दापोड्यातील ए. के. अँड कंपनीत काम करीत आहे. दरम्यान ठेकेदार काम करत असलेल्या कंपनीच्या मालकीच्या दिवे (अंजुर) येथील जागेत मेसर्स आय. टच. पब्लिसिटी या कंपनीचे होर्डिंग लावण्याकरिता सरपंच रेश्मा पाटील यांनी २७ जुलै २०२३ रोजी तक्रारदाराकडे दीड लाखांची मागणी केली होती; परंतु पंचासमक्ष तडजोडी अंती २८ जुलै रोजी आकाश जनार्दन म्हात्रे या सदस्याने २५ हजार रुपये कमी करण्याचे सांगितले. त्यास सदानंद पाटील यांनी प्रोत्साहन दिल्याने १ लाख २५ हजार रुपये लाचेच्या स्वरूपात मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे लाचलुचपत विभागाने संबंधित तिघांवर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ व १२ अन्वये नारपोली पोलीस ठाण्यात १० ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला. प्रकरणातील तिन्ही फरार लाचखोरांचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बल्लाळ यांनी दिली आहे.

भाजपच्या गोटात एकच खळबळ:विशेष म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात याच ग्रामपंचायतीत सरपंच पदावर निवडून येत झाली आहे. तर त्यांचा मुलगा सिद्धेश यानेही ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर राहून राजकीय जीवनात प्रवेश केला आहे. यामुळे गेली २५ वर्षांहून अधिक केंद्रीय राज्यमंत्र्यांचे वर्चस्व असलेल्या या ग्रामपंचायतीत लाचखोरीची घटना उघडकीस आल्याने जिल्ह्यासह भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, सरपंचाने लाच मागितल्याची अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

हेही वाचा:

  1. लाचप्रकरणात सुधागडमधील दुय्यम निबंधकाला अटक
  2. नाशिक: पोलीस चौकीतच लाच स्वीकारताना तीन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक
  3. 15 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी बीडीओसह कनिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात

ABOUT THE AUTHOR

...view details