महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 10, 2023, 6:34 PM IST

ETV Bharat / state

Thane Crime : ऑनलाईन जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, चार जुगार माफियांना बेड्या..

जिल्ह्यातील विविध शहरातील ऑनलाईन जुगाराच्या दुकानांमध्ये बिनदिक्कत चालणाऱ्या ऑनलाईन जुगाराच्या अड्ड्यांवर असंख्य जुगारी आपले नशीब अजमावत असतात. त्यातच भिवंडी शहरातील इस्लामपूरा परिसरात सुरू असलेल्या ऑनलाइन जुगार अड्ड्यावर भोईवाडा पोलिसांनी धाड टाकून चार जुगार माफियांना अटक केली आहे. उमेश साधूशरण गुप्ता (वय ३०), आतिक रहमान अन्सारी (वय ३८), ध्रुव मानसुखलाल मालदे (वय ३०), तामिल शहामोहमद फारुकी (वय ३४ सर्व रा.भिवंडी) असे अटक जुगार माफियांची नावे आहेत.

Police Raid on Online Gambling
ऑनलाईन जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

ठाणे :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील धामणकर नाका येथील अजंठा कंपाउंड जवळील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएमच्या मागील गल्लीतील एका लूम कारखान्याच्या गाळ्यात 'किंग' नावाच्या ऍप्लिकेशन ऑनलाइनच्या नावाने संगणकावर रॉलेट ऑनलाईन जुगार खेळला जात आहे. याची माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी सदर जुगार अड्ड्यावर शनिवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास छापा टाकून उमेश साधूशरण गुप्ता,आतिक रहमान अन्सारी, ध्रुव मानसुखलाल मालदे ,तामिल शहामोहमद फारुकी, या चौघांना रंगेहाथ ऑनलाईन जुगार खेळताना पकडून त्यांच्याकडून २ कॉम्पुटर आणि २ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.



जुगाराच्या आहारी गेलेल्यांमध्ये विद्यार्थ्यांचा भरणा अधिक :याप्रकरणी पोलीस नाईक उमेश चंद्रभान नागरे यांच्या फिर्यादीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करून या चौघांनाही अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोखंडे करीत आहेत. दुसरीकडे पोलिसांच्या या कारवाईमुळे ऑनलाइनच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांतील माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ऑनलाईन जुगार खेळाकडे तरुणाईला आकर्षित करण्यासाठी बहुतांश टीव्ही चॅनेलवर प्रसिद्ध अभिनेते, मॉडल हे जाहिरातीत झडकत असताना दिसत आहे. यामुळे अशा जुगाराच्या आहारी गेलेल्यांमध्ये शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा भरणा अधिक आहे.



जुगार माफीया पोसतात गुंडाच्या टोळ्या :ऑनलाईन जुगाराच्या अवैध व्यवसायातून मिळणाऱ्या पैशांतून हेच जुगार माफीया कुप्रसिद्धी गुंड टोळ्या पोसत आहे. मात्र त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या माफीयांनी आपल्या अड्ड्यांचे जाळे भिवंडी ,कल्याण, डोंबिवली, टिटवाळा आंबिवली, कोपर, ठाकुर्ली, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी रेल्वे स्टेशन परिसरात, तसेच सर्वसामान्यांची लोकवस्ती असलेल्या भागात थाटले आहेत. या जुगारात महाविद्यालयीनच नव्हे तर शाळकरी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गुरफटत चालली असून देशाचे उज्वल भवितव्य उध्वस्त होताना दिसत आहे.


हेही वाचा :गिरीश चौधरी यांना उच्च न्यायालयाचा पुन्हा झटका, एकनाथ खडसेंच्या जावयाला जामीन नाहीच

ABOUT THE AUTHOR

...view details