महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जव्हार येथे कुपोषण मुक्तीसाठी बाल संजीवनी छावणी; अमृता फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या बाल संजीवन छावणीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी जव्हार येथे झाले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजेंद्र गावित, ट्रस्टचे अध्यक्ष विवेक पंडीत उपस्थित होते.

By

Published : Jul 26, 2019, 11:24 PM IST

अमृता फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

पालघर (वाडा) - जिल्हा कुपोषण मुक्त करणे हा शासन आणि समाजाचा एकत्रित विषय आहे. त्यामुळे सर्वांनी प्रयत्न केल्यास या समस्येवर निश्चित मात करता येईल, असा विश्वास पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या बाल संजीवन छावणीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी जव्हार येथे झाले. यावेळी चव्हाण बोलत होते.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, अमृता फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यात शासनाने सुरू केलेल्या विविध उपाययोजनांमुळे कुपोषणाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. सर्वांनी एकत्र येऊन असेच काम सुरू राहिल्यास कुपोषण लवकरच संपेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आदिवासी भागात आयुर्वेदिक औषधे असतात. त्यामुळे या भागात आयुर्वेदिक एमआयडीसी सुरू करता येऊन रोजगारही वाढेल, असे त्यांनी सुचविले. बाल संजीवन छावणीच्या माध्यमातून कुपोषण मुक्तीसाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांचे कौतुक त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमामध्ये आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजेंद्र गावित, ट्रस्टचे अध्यक्ष विवेक पंडित, आमदार पास्कल धनारे, रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे आदी यावेळी उपस्थित होते.

आदिवासींच्या समस्या या कोणत्याही एका विभागाच्या नसून मुख्यमंत्र्यांनी या समस्यांच्या निराकरणासाठी संबंधित सर्व विभागांना एकत्र करून प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना यश येत असून लवकरच पालघर जिल्हा कुपोषण मुक्त होईल, असा विश्वास श्री चव्हाण यांनी व्यक्त केला. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आरोग्य विभागामार्फत दुर्गम आदिवासी भागात सुद्धा सेवा दिली जात आहे. या भागातील कुपोषण कमी करण्यासाठी शासन सर्व उपाययोजना करीत आहे. लहान वयात लग्न होऊ नयेत यासाठी ट्रस्टच्या वतीने समुपदेशन करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त करून ट्रस्टला आवश्यक असलेली रुग्णवाहिका देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

खासदार राजेंद्र गावित यांनीही ट्रस्टच्या कामाचे केले कौतुक

प्रास्ताविकाद्वारे विवेक पंडित यांनी ट्रस्टच्या कार्याची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी सर्व समस्या समजून घेतल्या आणि त्यावर उपाययोजना केल्या. त्यामुळे कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे ते म्हणाले. कुपोषणाने एकही मृत्यू होऊ नये ही मुख्यमंत्र्यांची भूमिका असून त्यांना सर्व ते सहकार्य केले जाईल, असल्याचे त्यांनी म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details