महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Crime: उसनवारीतून रेल्वेच्या टीसीसह आणखी एका व्यक्तीची सर्पदंश देऊन हत्या - उसनवारीच्या पैशातून हत्या

लाखोंची उसनवारी देणाऱ्या सेवानिवृत्त रेल्वेच्या टीसीचा उसनवारी घेणाऱ्या मुख्य आरोपीने साथीदारांसह सर्पमित्रांच्या मदतीने खून केला. टीसीला विषारी सर्पदंश देऊन गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह शेतात पुरल्याची घटना घडली होती. ही घटना शहापूर तालुक्यातील शिवनेर फर्डेपाडा गावाच्या हद्दीत असलेल्या एका शेतात घडली आहे. ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावला. आरोपींनी आणखी एका व्यक्तीची पैशांच्या वादातून अशाच प्रकारे हत्या केल्याचेही पोलिसांनी निष्पन्न केले.

Thane Crime:
सर्पदंश देऊन हत्या

By

Published : Jun 25, 2023, 10:36 PM IST

ठाणे:पोलिसांनी दोन्ही हत्येप्रकरणी आतापर्यंत ५ आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. अरूण फर्डे आणि सोमनाथ जाधव असे सुरुवातीला अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर गणेश खंडागळे, नारायण भोईर, जयेश फर्डे असे अटक केलेल्या सर्पमित्र असलेल्या आरोपींची नावे आहेत. रमेश मोरे ( रा. टिटवाळा) असे फरार असलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. गोपाळ रंगया नायडू (वय 62, रा. चक्की नाका कल्याण पूर्व) असे हत्या झालेल्या सेवानिवृत्त टि.सी.चे नाव आहे.


मृतदेह आढळला खड्डयात:ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जून रोजी शहापूर तालुक्यातील शिवनेर फर्डेपाडा गावाच्या हद्दीत अटक आरोपी अरुण फर्डे यांच्या शेतात एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह खड्डयात पुरलेल्या स्थितीत मिळून आला होता. या घटनेची माहिती शहापूर पोलीस पथकाला मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. यानंतर तहसील प्रशासन, शासकीय डॉक्टर आणि अधिकाऱ्याच्या उपस्थितीत शेतातील खड्ड्यात पुरलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आला. शहापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेहाची ओळख पटविण्याचा तपास सुरू केला.


अंगठीवरून पटली ओळख:ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी सदर मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलीस पथके तयार केली. विशेष म्हणजे, मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून आरोपींनी मृतकाच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा केल्या होत्या. तर मृताच्या अंगात केवळ बनियान आणि अंडरवेअर होते. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटविण्याचे पोलीस पथकासमोर आव्हान होते. तपासादरम्यान मृतदेहाचा अहवाल आल्यानंतर टीसीची विषारी सर्पदंश करून त्यांचा शस्त्राने गळा चिरल्याचे समोर आले. दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचे फोटो, वर्णन आणि नाव प्राप्त केली. त्यानंतर मृतदेहाच्या हातातील बोटात असलेल्या अंगठीवरून ओळख पटविली असता मृतक कल्याण पूर्वेतील चक्की नाका येथे राहणारा गोपाळ रंगया नायडु असल्याचे निष्पन्न झाले.

हत्या केल्याची दिली कबुली:गुन्हे शाखेच्या पथकाने मृतकच्या नातेवाईकांना मृतदेह दाखविला असता त्यांनी गोपाळ नायडु यांचाच मृतदेह असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान, ठाणे ग्रामीण गुन्हे शाखा पथकाने गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक तपास करून हत्या करणाऱ्या आरोपीचा शोध घेतला. यामध्ये अरुण जग्गनाथ फर्डे आणि सोमनाथ रामदास जाधव याला कल्याणमधून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केला असता त्यांनी फरार मुख्य आरोपी रमेश मोरेसह हत्येची कबुली दिली.

या कारणातून हत्या:धक्कादायक बाब म्हणजे फरार मुख्य आरोपी मोरे याने मृतक गोपाळ यांच्याकडून 16 लाख रुपये उसने घेतले होते. पैसे परत मिळण्यासाठी मृतक गोपाळ, बाळू पाटील हे मुख्य आरोपी मोरे याच्याकडे तगादा लावत होते. त्याचाच राग मनात धरून मुख्य आरोपी मोरे याने सर्पमित्र आणि त्यांच्या साथीदाराच्या मदतीने खुनाचा कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आले.

असा आखला प्लान:३ जून रोजी मृत गोपाळ यांना उसने पैसे परत देण्याच्या बहाण्याने शहापूर तालुक्यातील शिवनेर फर्डेपाडा गावाच्या हद्दीत असलेल्या आरोपी अरुण फर्डे याच्या शेतात नेऊन दारूची पार्टी केली. त्यानंतर गोपाळ यांना विषारी नागाचा सर्पदंश देऊन नंतर त्यांचा शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या करून त्यांचा मृतदेह शेतातील एका खड्ड्यात पुरल्याचे निष्पन्न झाले. तसेच बाळू पाटील यांचीही पैशांच्या व्यवहारातून सर्पदंश देऊन हत्या केल्याचे समोर आले.

ABOUT THE AUTHOR

...view details