ठाणे- जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भिवंडी तालुक्यातील कांदळी गावातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. यावेळी शासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षित कारभारामुळे मागील वर्षी झालेल्या नुकसानाचा मोबदला अजूनही मिळाला नसल्याचा पाढा पालकमंत्री शिंदे यांच्यासमोर मांडण्यात आला. त्यावर यावर्षी एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिले.
माहिती देताना पालकमंत्री एकनाथ खडसे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे तातडीने पंचनामे करून लवकरात लवकर अहवाल शासनाकडे पाठवण्याचे निर्देश शिंदे यांनी शासकीय यंत्रणेला दिले. मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने राज्यभर थैमान घातल्याने बळीराज्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांवर हातातोंडाशी आलेले पीक हिरवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे, शासनाने शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतीच्या नुकसानाची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर पंचनामे करण्याचे निर्देश शासकीय यंत्रणेला दिले आहेत. राज्यासह ठाणे जिल्ह्यात देखील परतीच्या पावसामुळे भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. भिवंडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. यावर्षी तालुक्यात सुमारे १६ हजार हेक्टर भातशेतीची लागवड करण्यात आली होती. मात्र, परतीच्या पावसामुळे सुमारे ८ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रातील भातशेतीचे नुकसान झाले, अशी माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यात सुमारे ४५ टक्के नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण झाले असून येत्या चार ते पाच दिवसात उर्वरित सर्व पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना शासकीय मदत दिली जाईल, असे आश्वासन शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिले. या पाहणी दौऱ्या प्रसंगी कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, राज्याच्या हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, प्रताधिकारी मोहन नळदकर, ठाणे जिल्हापरिषदेच्या जिल्हाध्यक्षा सुषमा लोणे, आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील, तहसीलदार अधिक पाटील, गट विकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे व कृषी अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा-घरावर वीज कोसळून 26 जण जखमी; ठाण्याच्या शहापूरमधील घटना