महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हाथरस प्रकरण : मुंबईत गुन्हा दाखल करून तपास मुंबई पोलिसांनी करावा - आमदार प्रताप सरनाईक - pratap sarnaik demands

उत्तरप्रदेशमधील युवतीवर झालेल्या अत्याचारा विरोधात देशातील राजकारण तापू लागले आहे. गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी दिलेल्या वागणूकीबाबत संपूर्ण देशभर काँग्रेसमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

pratap sarnaik, spokesperson shivsena
प्रताप सरनाईक (प्रवक्ते आणि आमदार, शिवसेना)

By

Published : Oct 2, 2020, 11:07 PM IST

मीरा भाईंदर (ठाणे) -उत्तरप्रदेश मधील हाथरसमध्ये युवतीवर झालेल्या अत्याचारा विरोधात देशभरातून योगी सरकारवर टीका होत आहे. याप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करावा आणि याप्रकरणाचा तपासही मुंबई पोलिसांनी करावा, अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली. सरनाईक यांनी शुक्रवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ट्विटरवर टॅग करत ही मागणी केली.

प्रताप सरनाईक (प्रवक्ते आणि आमदार, शिवसेना)

उत्तरप्रदेशमधील युवतीवर झालेल्या अत्याचारा विरोधात देशात राजकारण तापू लागले आहे. गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी दिलेल्या वागणूकीबाबत संपूर्ण देशभर काँग्रेसमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. यामध्ये आता शिवसेनेनेसुद्धा उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे.

उत्तरप्रदेशमध्ये अत्याचार झालेल्या युवतीच्या प्रकरणाचा तपास ज्याप्रकारे उत्तरप्रदेश पोलीस करत आहेत, तो संशयास्पद आहे. त्यामुळेच आज मी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ट्विट केले आहे, असे सरनाईक म्हणाले. हाथरस प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच मुंबई पोलिसांनी त्याचा तपास उत्तरप्रदेशमध्ये जाऊन करावा. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी बिहार पोलीसांनी मुंबईत येऊन तपास केला. याप्रमाणे मुंबई पोलिसांनीदेखील उत्तरप्रदेशमध्ये जावे, अशी मागणीही त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. यानंतर या तरुणीला पुढील उपचारासाठी दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी पीडितीचे मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि तिचा मृत्यू झाला. यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी रातोरात या पीडितेचा मृतदेह जाळल्याचे समोर आले. यानंतर हे संपूर्ण प्रकरण चिघळले आहे. त्यामुळे आता योगी सरकारवर सर्व स्तरांतून टीका होत आहे. यामुळे योगी सरकारने हाथरस जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक आणि पाच पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई केली आहे.

दरम्यान, ही घटना दुर्दैवी असून आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. उत्तर प्रदेश सरकार काही तरी, लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा संशय त्यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details