महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 18, 2020, 6:59 PM IST

ETV Bharat / state

भिवंडीत आणखीन दोन कोरोनाग्रस्त; रुग्णांची संख्या ६ वर

आज दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या पैकी एक रुग्ण हा पोलीस कर्मचारी असून तो कोनगाव परिसरात कुटुंबासह वास्तव्याला आहे. तर दुसरा कोरोनाबाधित रुग्ण हा कशेळी गावातील रहिवाशी असून तो ठाणे महापालिकेचा कर्मचारी असल्याचे समोर आले आहे.

भिवंडी
भिवंडी

ठाणे - कामगारांची नगरी म्हणून ओळख असलेल्या भिवंडीत शहर आणि ग्रामीण परिसरात ११ एप्रिलपर्यत एकही कोरोनाबाधित रुग्ण नव्हता. मात्र, कोरोना आजाराने याही तालुक्यात पाय पसरले असून गेल्या ७ दिवसात भिवंडी शहर आणि ग्रामीण परिसरात ६ रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

आज दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या पैकी एक रुग्ण हा पोलीस कर्मचारी असून तो कोनगाव परिसरात कुटुंबासह वास्तव्याला आहे. तर दुसरा कोरोनाबाधित रुग्ण हा कशेळी गावातील रहिवाशी असून तो ठाणे महापालिकेचा कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता भिवंडीतही वाढू लागला आहे. सर्वात पहिला रुग्ण शहरातील बंगालपुरा येथे, तर दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागातील पडघा-बोरिवली येथे एक महिला असे दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यांनतर १७ एप्रिलला शहरातील वेताळपाडा व अवचितपाडा या भागात दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली होती. आता मात्र नव्याने दोन रुग्णांची भर पडल्याने एकूण ६ रुग्णांची भिवंडी शहर व ग्रामीण भागात नोंद झाली आहे.

संवेदनशील व कामगारनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी शासन व पोलीस व महानगरपालिका प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, अनेक ठिकाणी जंतुनाशक औषध फवारणी व कचरा उचलण्यास दिरंगाई केली जात असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.

ग्रामीण भागातील कोनगाव परिसरात राहणारा पोलीस कर्मचारी 'पॉझिटिव्ह' आढळून आला आहे. हा पोलीस कर्मचारी मुंब्रा पोलीस ठाण्यात कार्यरत असून याठिकाणी वरिष्ठ पोलीस निरिक्षकासह अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर लागण झालेल्या या पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील ५ जणांना विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले. तर दुसरा रुग्ण ठाणे महानगरपालिका स्वच्छता विभागात मुकादम म्हणून काम करणारा असून त्याला ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर त्यांच्या कुटुंबातील ४ व्यक्तींना टाटा आमंत्रण येथील विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी दिली. हा रुग्ण ज्या कशेळी ग्रामपंचायतीच्या भागात वास्तव्यास आहे. त्या ठिकाणी खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. डावखर व त्यांचे आरोग्य पथकाने स्थानिक नारपोली पोलिसांच्या मदतीने रुग्णाच्या इमारती लगतच परिसर सील करीत नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू केल्याची माहिती गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे यांनी दिली.

भिवंडी शहर व ग्रामीण भाग मागील काही दिवसांपासून कोरोनापासून सुरक्षित असताना भिवंडी शहरात 3 तर ग्रामीणमध्ये ३ असे एकूण ६ रुग्ण तालुक्यात आढळून आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. तर कोरोनाचा सामना करण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत सुरक्षित पाळावे व अनावश्यक घराबाहेर पडू नये, असे आवाहन भिवंडीचे उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details