ठाणे- मोदी सरकारच्या मुक्त बाजार करारामुळे (आर.एस.सी.पी) देशभरातील लाखो यंत्रमाग कारखाने बंद पडून देशात प्रचंड आर्थिक मंदीची लाट येणार असल्याची शंका, खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भिवंडीत व्यक्त केली आहे. भिवंडी पश्चिम मतदारसंघातून एमआयएमचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार खालील गुड्डू शेख यांच्या प्रचार सभे प्रसंगी ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
खासदार ओवैसी पुढे म्हणाले की, यंत्रमाग व्यवसायाचे मूळ केंद्र असलेल्या भिवंडी शहराची आणि यंत्रमाग उद्योगाची आज दैनीय परिस्थिती झाली आहे. मात्र त्याकडे या सरकारचे लक्ष जात नाही. नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशाचा जीडीपी दर पाच टक्क्यांवर आला असून देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आर.एस.सी.पी करार करून चायना आणि इतर देशात स्वस्त मिळणारा फॅब्रिक कपडा देशात आणला जाईल. त्यामुळे भिवंडीसह देशभरातील लाखो यंत्रमाग कारखाने बंद पडून करोडो कामगार मोदींच्या राजवटीत बेरोजगार होणार असल्याची टीका ओवैसी यांनी केली आहे.