महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 17, 2020, 5:46 PM IST

Updated : Sep 17, 2020, 7:15 PM IST

ETV Bharat / state

'क्या हुआ तेरा वादा?' म्हणत ठाण्यात मनसेचे थाळी नाद आंदोलन

आज (गुरुवारी) ठाणे मनपाच्या मुख्यालयाच्या बाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून थाळीनाद आंदोलन करण्यात आले. ठाणे मनपात शिवसेनेची सत्ता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे.

mns thalinad agitation
मनसेचे थाळीनाद आंदोलन

ठाणे -गेल्या काही दिवसांत विविध मुद्द्यांवरून येथील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेला घेरण्याची रणनीती भाजपा आणि मनसेकडून आखली जात आहे. आता 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी अद्याप का देण्यात आली नाही? यावरुन दोन्ही पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. केवळ निवडणुकीपुरते शिवसेनेने करमाफीचे वचन दिले आहे. याच पार्श्वभूमीवर 'क्या हुआ तेरा वादा?' म्हणत मनसेकडून ठाणे मनपाच्या मुख्यालयाच्या बाहेर आज (गुरुवारी) थाळीनाद आंदोलन करण्यात आले.

'क्या हुआ तेरा वादा?' म्हणत ठाण्यात मनसेचे थाळी नाद आंदोलन

तर दुसरीकडे भाजपाच्या वतीने शहरात ठिकठिकाणी 'क्या हुआ तेरा वादा?' या आशयाचे फलके लावण्यात आले आहेत. तर भाजपाकडून करण्यात आलेली फलकबाजी ही मनसेची घोषणा आहे. भाजपाने ती चोरली असल्याच्या आरोप मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे.

ठाणे महापालिकेत भाजपाचे 24 नगरसेवक असताना ते रस्त्यावर का उतरत नाहीत? ते काय झोपा काढतात का? असा टोला जाधव यांनी भाजपाला लगावला आहे. क्या हुआ तेरा वादा ही घोषणा आमचीच आहे. भाजपा नेते ते चोरत होते. आता आंदोलनही चोरायला लागले आहेत कि काय? अशी टीका जाधव यांनी केली.

तर 'ठाण्यात शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना' असे बोलले जाते. मात्र, कोणत्याही आश्वासनाची पूर्तता शिवसेनेकडून होत नाही. निवडणुकीत 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना अजूनही करमाफी देण्यात आलेली नाही. लोकांची मते घेतली आणि लोकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असा आरोप अविनाश जाधव यांनी केला.

Last Updated : Sep 17, 2020, 7:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details