महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 20, 2019, 10:36 PM IST

ETV Bharat / state

कल्याणचा सुभेदार ठरण्यासाठी उरले अवघे दोन दिवस; अनेकांच्या लागल्या छोट्या-मोठ्या पैजा

कल्याणचा सुभेदार ठरण्याचे निकाल हाती यायला अवघे ४८ तास उरल्याने कोण जिंकणार व कोण हरणार?  यावर आता कपभर चहापासून ते पार्टीपर्यंत अनेकांच्या छोट्या-मोठ्या पैजा लागल्या आहेत.

ठाणे

ठाणे - लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. त्यामुळे आता सर्वांना निवडणूक निकालाची प्रतीक्षा लागली आहे. राज्यात सर्वत्र चांगले मतदान झाले.तिसऱ्या टप्प्यात पुणे मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले होते. त्यानंतर चौथ्या टप्यात सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या कल्याण लोकसभा मतदारसंघातही सर्वात कमी मतदान झाल्याची नोंद झाली आहे. मतदान कमी झाल्याने राजकीय पक्ष व उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. त्यातच कल्याणचा सुभेदार ठरण्याचे निकाल हाती यायला अवघे ४८ तास उरल्याने कोण जिंकणार व कोण हरणार?यावर आता कपभर चहापासून ते पार्टीपर्यंत अनेकांच्या छोट्या-मोठ्या पैजा लागल्या आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघात तब्बल २८ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. तरीही शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील यांच्यात सरळ लढत झाली. मागील निवडणुकीत नवख्या असणाऱ्या श्रीकांत शिंदे यांनी मोदी लाटेत तब्बल अडीच लाखांचे मताधिक्य मिळवले होते. यंदा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात जातीचे राजकारण तापले होते. त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील यांना किती होतो,हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. सेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे दुप्पट मतांनी निवडून येतील,असा दावा सेनेकडून करण्यात आला आहे.तर आश्चर्यकारक निकाल असेल,असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरासह राज्यात सर्वत्र चांगल्या प्रकारे मतदान झाले. तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत केवळ पुणे लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी कमी झाली होती. सुशिक्षित आणि सांस्कृतिक नगरी असलेल्या पुण्यातील सर्वात कमी मतदानाची पुनरावृत्ती कल्याण लोकसभा मतदारसंघातही झाली. शहरी भागातील सुशिक्षित मतदार लोकसभा व विधानसभा निवडणुकीला मतदान करण्यासाठी फारसा उतरत नाही.हा आजवरचा अनुभव यावेळीही खरा ठरला. मागील लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असताना कल्याण लोकसभा मतदारसंघात अवघे ४२.८० टक्के मतदान झाले होते.

यंदा कोणाचीही लाट नव्हती. मात्र, मतदान वाढले नाही. त्यामुळे निकालाबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मतदानाची वेळ दोन-चार दिवसांवर आलेली असताना यावेळी तशा प्रकारचे वातावरण कुठेही दिसले नाही. उमेदवारांनी देखील एखाद दुसरी सभा घेतली. स्वत: उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचले नाही. उमेदवारांचे परिचय पत्र,जाहीरनामा व मतदान स्लीपदेखील मतदारांपर्यंत पोहोचल्या नाहीत. जास्तीत जास्त मतदान व्हावे,यासाठी मतदारांना घराबाहेर काढण्याचे प्रयत्न राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून झाले नाहीत. राजकीय पक्ष,त्यांचे उमेदवार व कार्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसला नाही. या सर्वांचा एकत्रित परिणाम मतदान कमी होण्यात झाला. त्यामुळे त्याचे परिणाम निवडणुकीच्या निकालावर होईल,असा अंदाज लावला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details