ठाणे : जिल्ह्यातील कल्याण - डोंबिवली ते बदलापूरपर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत चालली आहे. असे असताना अचानकपणे लिक्विड ऑक्सिजनचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलपूरसह ग्रामीण परिसरात खासगी कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या एजन्सीने पाठ फिरवल्याने जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन मिळविण्यात अडचण येत आहे. यामुळे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापुरात सध्या लिक्विड ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत आहे. कल्याण-डोंबिवली ते बदलापूरपर्यत बहुतांश मोठ्या खासगी रुग्णालयात शेकडो रुग्ण उपचार घेत असून त्यातील अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. मात्र, ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने या रुग्णालयांनी ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना इतरत्र हलविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यासंदर्भात संबंधित रुग्णालय प्रशासन मात्र, कोणतीही जबाबदारी घेताना दिसत नाही. तर, दुसरीकडे अचानक डॉक्टरांनी रुग्णाला हलविण्यास सांगितल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. त्यातच ऑक्सिजन बेड इतरत्र उपलब्ध होत नसल्याने नेमकं रुग्णांना न्यावे तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे, आयसीयू आणि व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. तर, जे रुग्ण हाय-फ्लो ऑक्सिजनवर आहेत, त्यांना खासगी रुग्णवाहिकेचा आधार घेण्याची वेळ येत आहे. मात्र, इतर रुग्णांचे हाल कायम राहिले असून त्यांची जबाबदारी अधिकारी घेत नसल्याचे समोर आले आहे.