ठाणे -कल्याण तालुक्यातील औद्योगिक ग्रामपंचायत म्हणून कांबा ग्रामपंचायत हद्दीतील कल्याण - मुरबाड मार्गाच्या दोन्ही बाजूने लगत असलेल्या ३७० एकर जमीन ही सरकार जमा करण्याचे आदेश कल्याणचे उपविभागीय अधिकारी डॉ. अभिजीत भांडे - पाटील यांनी दिले आहे. तीनशे एकर सरकारी जमिनीवर डल्ला मारणाऱ्या बिल्डर्स टोळीला प्रांत अधिकाऱ्यांनी चांगलाच हिसका दाखवला आहे. त्यामुळे गेली १५ वर्षे कायदेशीर लढा देणारे शेतकरी, गोरगरीब आदिवासी यांना अखेरीस यश मिळाले ( 370 acres land confiscated in kamba grampanchayat in kalyan ) आहे.
जागेला सोन्याचा भाव -कल्याण - मुरबाड महामार्गालगत कांबा ग्रामपंचायत हद्दीत राज्य शासनाची शेकडो एकर जागा आहे. येथे शहा बिल्डर्स आणि कंपनीची देखील शेकडो एकर जमीन आहे. कांबा ग्रामपंचायत हा औद्योगिक पट्टा म्हणून विकसित झाल्याने येथे जागेला सोन्याचा भाव प्राप्त झाला आहे. येथील आदिवासी, शेतकरी, गोरगरीब हे वर्षानुवर्षे शेती करत आहेत. पर्यायाने यातील बहुतांश जमीनीवर यांची कब्जेवहिवाट आहे. त्यामुळे सर्व्हे नंबर ५१, १, १५० एकर, ३५, १-१४ एकर, ७७-१७० एकर, ६४, ३५ एकर, आणि सर्व्हे नंबर १२५- १ एकर अशा सुमारे ३७० एकर पेक्षा जास्त जागेचा कुळवहिवाटीचा वाद न्यायालयात सुरू आहे.
१५ वर्षे सुरू होता न्यायालयीन लढा - संजय शहा, राजेश शहा, शांतीलाल शहा, मिलिंद शहा आणि सावकार विरुद्ध शेतकरी देवराम सुरोशे, शाताराम बनकरी (मयत) भागीरथी शांताराम बनकरी, विठ्ठल बनकरी, भगवान बनकरी, बुधाची बनकरी, नारायण बनकरी, सोनूबाई भोईर सुमन भोईर, कल्पना चौधरी, राजेंद्र कुंडले, सोमित्र गोसावी, (मयत) वांसती गोसावी, सचिन गोसावी, आदित्यी गोसावी, अनुराधा गोसावी, अंजली कळसकर यांच्यात न्यायालयीन लढा सुरू होता. गेली १५ वर्षे विविध प्रकारच्या न्यायालयात दावे - प्रतिदावे सुरू होते.