ठाणे:वाहतूक कोंडीच्या घुसमटीत अडकलेले ठाणे आणि डोंबिवली यांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत मुंब्रा वाय जंक्शन पूल आणि कळवा क्रिक उड्डाणपूलचे निर्माण करण्यात आले आहे. पूल पूर्णही झाले. पालिका प्रशासनाने मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्र्यांना उदघाटनासाठी पत्र पाठवले असून त्यांचा वेळ मागितला आहे. मात्र त्यांच्याकडून कोणताही रिस्पॉन्स न आल्याने हे दोन्ही प्रकल्प उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे ठाणेकरांमध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये नाराजगीचे सूर आहेत.
२०१० रोजी हालचाली सुरु:कळवा परिसरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करणार्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाची एक लेन आता महिनाभरानंतर खुली होणार आहे, असे प्रशासन सांगत आहे. मात्र प्रत्यक्षात मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उद्घाटनाच्या वेळेच्या प्रतीक्षेत हा पूल आहे. मुंबईतील सी लिंकच्या धर्तीवर हा पुल पालिकेने तयार करण्यासाठी २०१० रोजी हालचाली सुरु केल्या होते. परंतु प्रत्यक्षात कामाला सुरवात होण्यासाठी २०१४ साल उजाडले. त्यावेळेस या पुलाच्या कामाचा खर्च १६९ कोटींचा अपेक्षित धरण्यात आला होता. परंतु आता तो खर्च १८३ कोटींवर गेला आहे. कळवा पुलाच्या एका मार्गिकेची शिल्लक कामे तत्काळ पूर्ण करावीत, असे महानगरपालिकेचे आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी दौरा करून प्रशासनाला सांगितले आहे.