ठाणे - भरधाव वेगातील दुचाकी आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वारासह रिक्षाचालक, महिला आणि एक शाळकरी मुलगा असे चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास भिवंडी पारोळ रोडवरील कांबे - जुनांदुर्खी गावच्या वेशीवरील साई धाब्यासमोर घडली. या प्रकरणी निजामपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.
हेही वाचा -बेळगाव सीमाप्रश्न : मुख्यमंत्र्याकडून दोन-समन्वयक मंत्र्याची नियुक्ती, प्रत्येक महिन्याला आढावा बैठक
या अपघातात दुचाकी चालक आदेश संदीप पवार (वय २०, रा. लाखीवली) आणि रिक्षा चालक जनार्दन पाटील (वय ५२), रिक्षातील प्रवासी चंद्रकला विनोद रसाळ (वय ४०), किरण दिनेश पाटील (वय १२) असे चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. यातील तिघांना उपचारासाठी तातडीने सिराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर किरण याच्या उजव्या पायाला तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याने त्याला बेशुद्धावस्थेत तात्काळ ठाण्याच्या ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
हेही वाचा -मुंबईत मागील 9 वर्षात शून्य एन्काऊंटर; 'या' गँगच्या गुंडाचा केला होता शेवटचा खात्मा
दुचाकीस्वार आदेश पवार हा लाखीवली येथून मोटार सायकलवरून भिवंडीकडे सायंकाळच्या सुमाराला निघाला होता. त्यावेळी भिवंडी पारोळ रोडवरील साई धाब्यासमोरील वळणावर समोरून भरधाव रिक्षा आली असता दोन्ही वाहने चालकांचे नियंत्रण सुटल्याने समोरासमोर आल्याने एकमेकांना धडकली. त्यामध्ये दोन्हीं चालकांसह प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघात प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.