ठाणे - लॉकडाऊन काळातही भिवंडी परीसरात आग लागण्याच्या घटना वारंवार घडतच आहेत. विशेष म्हणजे सहा दिवसात भीषण आग लागल्याची ही चौथी घटना घडली आहे. दोन दिवसापूर्वीच राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील गोदामात साठवून ठेवलेल्या कोट्यवधींचे धाग्याचे कोम जळून खाक झाले. असे असतानाच पुन्हा प्लास्टिक रोल साठवलेल्या कारखान्याला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागण्याची घटना घडली आहे.
शॉर्टसर्किटमुळे प्लास्टिक कारखान्याला भीषण आग, कारखान्यासह ३ गोदामे जळून खाक
कांबे रस्त्यावरील तळवली नाका येथील प्लास्टिक रोलचा कारखाना लॉकडाऊनमुळे बंद आहे. मात्र, रात्रीच्या सुमाराला कारखान्याबाहेर अचानक शॉर्टसर्किट होऊन त्याच्या ठिणग्यांनी कचऱ्याने पेट घेत, ही आग नजीक असलेल्या या कारखान्यात पसरत गेली. या भीषण आगीत प्लास्टिकचा लाखोंचा साठा जाळून खाक होत असतानाच, या कारखान्याच्या दोन्ही बाजूकडील तीन गोदाम देखील जळून खाक झाले आहेत.
भिवंडी तालुक्यात लॉकडाऊनमुळे सर्वच कारखाने, गोदामे बंद आहेत. याप्रमाणे तालुक्यातील कांबे रस्त्यावरील तळवली नाका येथील प्लास्टिक रोलचा कारखाना देखील बंद आहे. मात्र, हा कारखाना बंद असताना रात्रीच्या सुमाराला कारखान्याबाहेर अचानक शॉर्टसर्किट होऊन त्याच्या ठिणग्यांनी कचऱ्याने पेट घेत, ही आग नजीक असलेल्या या कारखान्यात पसरत गेली. या भीषण आगीत प्लास्टिकचा लाखोंचा साठा जाळून खाक होत असतानाच, या कारखान्याच्या दोन्ही बाजूकडील तीन गोदाम देखील जळून खाक झाले आहेत.
या आगीची घटना समजताच भिवंडी महानगरपालिका अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली. खाजगी टँकरच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच कारखान्यात प्लास्टिक साठा असल्याने आगीचे लोळ मोठया प्रमाणात उसळत होते. दरम्यान, तीन तासाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले आहे.