महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 7, 2021, 5:28 PM IST

ETV Bharat / state

आदित्य बिर्ला समूहाच्या कंपनी विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

एका आदिवासी शेतकऱ्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्याची जमीन हडप केल्याप्रकरणी प्रसिद्ध उद्योग समूहासह दोघांविरुद्ध वाडा पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित आदिवासी गोपाल मंगेश वाघ यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाडा पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी गणेशपुरी येथील शंकर दिनकर आणि ग्रासिम इंडिया (अल्ट्राटेक) च्या व्यवस्थापकीय मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पीडित आदिवासी गोपाल मंगेश वाघ
पीडित आदिवासी गोपाल मंगेश वाघ

ठाणे - एका आदिवासी शेतकऱ्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्याची जमीन हडप केल्याप्रकरणी प्रसिद्ध उद्योग समूहासह दोघांविरुद्ध वाडा पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित आदिवासी गोपाल मंगेश वाघ यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाडा पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी गणेशपुरी येथील शंकर दिनकर आणि ग्रासिम इंडिया (अल्ट्राटेक) च्या व्यवस्थापकीय मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे ग्रासिम इंडिया (अल्ट्राटेक) हा उद्योग आदित्य बिर्ला समूहाचा भाग आहे.

आदिवासी शेतकरी १२ वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत -

वाडा तालुक्यातील मौजे चिखले – विजयपुर येथील शेतकरी गोपाल मंगेश वाघ हे कातकरी या आदिम जमातीचे असून, १२ वर्षापूर्वी त्यांची ३ एकर जमीन शंकर दिनकर याने त्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन फसवणूक करून विकत घेतली. शिवाय त्या जमिनीचा मोबदला १० लाख रुपये ठरला असताना, पीडीत शेतकरी गोपाळ वाघ याला आजपर्यंत केवळ दीड लाख रुपये देण्यात आले. यानंतर दिनकर याने त्याची पत्नी निर्मला सुतार हिचे नाव ७/१२ उताऱ्यावर लावले आणि ती जागा त्याने परस्पर ग्रासिम इंडिया अल्ट्राट्रेक सिमेंट कंपनीला विकल्याचा आरोप पीडित शेतकऱ्याने केला आहे. तसेच पीडित गोपाल वाघ हे संबंधित जागेवर गेले असता, त्या जागेचे सपाटीकरण करून त्यावर बांधकाम सुरु असल्याचेही त्याच्या निदर्शंस आले. त्यावेळी तेथील सुरक्षा रक्षकाने त्याला जबरदस्तीने हुसकावून लावल्याचा आरोपही पीडित शेतकऱ्याने आपल्या तक्रारीत केला आहे. याबाबत पीडित शेतकरी गेल्या १२ वर्षांपासून शंकर दिनकर याच्याकडे आपल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी लढा देत आहे, मात्र शंकर दिनकर याच्याकडून त्याला उडवाउडवी उत्तरे देऊन टाळत असल्याचे गोपाळ वाघ यांनी सांगितले.

पोलिसांचा तपास सुरु -

वाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुधीर संखे यांनी सांगितले की, पीडित शेतकरी गोपाळ वाघ याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गणेशपुरी येथील शंकर दिनकर आणि ग्रासिम इंडिया (अल्ट्राटेक) च्या व्यवस्थापकीय मंडळाविरुद्ध आयपीसी कलम ४२०, ४४७, आणि ३४१ तसेच अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा १९८९ कलम ३ (१) (एफ), ३ (१) (जी) आणि २ (व्ही. ए.) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन याबाबत पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत परदेशी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

आदिवासी क्षेत्र आढावा समितीच्या बैठकीमुळे प्रकार उघडकीस -

वाडा तालुक्यातील चिखले – विजयपुर येथील आदिवासी शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचे प्रकरण जेव्हा राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) विवेक पंडित यांचे निदर्शनास आले असता त्यांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेत सोमवारी याबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची आणि पिडीत आदिवासी शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याबाबत सर्व संबंधित अधिकार्यांना सूचना दिल्या होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details