ठाणे - कोरोना आजार हा एचआयव्हीसारखा नाही. त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून समाजाने माणुसकी धर्म जपला पाहिजे, असे मत कोरोनाला हरवून परतलेल्या एका पोलीस उपनिरीक्षिकाचे आहेत. ते शहापूर तालुक्यातील वाशिंदचे रहिवाशी असून सध्या ते मुलूंड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. काही दिवसापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर वेदांत रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांना आलेले अनुभव त्यांनी समाज माध्यमावर लिहिले आहेत.
काही दिवसापूर्वी कर्तव्य बजावत असताना या पोलीस उपनिरीक्षकाला कोरोनोची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर ठाण्यातील वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. कालच त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. मात्र, कोरोनाची लागण झालेल्या या पोलीस उपनिरीक्षकाला उपचारादरम्यान अनुभव आले. हे अनुभव त्यांनी गावातील नातेवाईक आणि मित्रांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले. त्या पोस्टमध्ये सर्वात आधी रुग्णालयात असताना गावाचे पोलीस पाटील रामदास राव यांनी माझ्या कुटुंबाला रोज लागणाऱ्या दुधापासून ते इतर अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करून चांगल्याप्रकारे सेवा केली. त्यांचे आभार मानले आहेत. तसेच गावातील हितचिंतक व प्रशासन यांचे सुद्धा आभार मानले.
समाज माध्यमावर मांडले अनुभव -
मला कोरोना झाल्याने त्यासोबत कसे लढायचे हे शिकविले. तसेच कोरोनाने मला ध्यान-साधना (विपश्यना ) करायला व पुस्तके वाचायला पुष्कळ वेळ दिला. आणि समाज्यातील स्वार्थी, निस्वार्थी, ज्ञानी, अज्ञानी व्यक्तींची जाणीव करून दिली. एकांत वासातील जीवन जगण्यास शिकविले म्हणून कोरोना विषाणूचेही त्यांनी मनपूर्वक आभार मानले . पुढे त्यांनी कोरोना विषाणूशी कसे लढायचे हेही सांगितले. माझ्यावर नामांकित चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना मला फक्त मल्टी व्हिटॅमिन गोळ्या, गरम पाणी, काढा, हळद मिश्रित दुध एवढेच उपचार दिले आणि त्यातच मी बरा झालो. मला आपणास एवढेच सांगणे आहे, की आपण सर्वांनी स्वतः पॉझिटिव्ह आहोत असे गृहीत धरून रोज गरम पाणी, काढा, हळद मिश्रित दूध पिण्याची सवय लावा. तसेच अंडी आणि उत्तम आहाराचे सेवन करून योग व्यायाम करा. आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.