महाराष्ट्र

maharashtra

मीरा भाईंदर शहरात खड्ड्यांचे साम्राज्य, काँग्रेस आंदोलनाच्या पवित्र्यात

प्रशासनाकडे आम्ही गणेशोत्सव सुरू होण्याच्या अगोदर खड्डे बुजवण्याची मागणी केली होती. दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन झाले आहे. पुढे पाच, सात, दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन बाकी आहे. मात्र, अजूनही खड्डे बुजवण्याचे ठोस काम झालेले नाही. प्रशासनाने लवकरात लवकर खड्डे बुजवावेत, अन्यथा आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात आहोत, अशी प्रतिक्रिया काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी 'ईटीव्ही भारत' ला दिली.

By

Published : Aug 25, 2020, 5:13 PM IST

Published : Aug 25, 2020, 5:13 PM IST

मीरा भाईंदर शहरात खड्ड्यांचे साम्राज्य
मीरा भाईंदर शहरात खड्ड्यांचे साम्राज्य

ठाणे- मीरा भाईंदरच्या मुख्य मार्गांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांना वाट मिळणे अवघड झाले आहे. त्याचप्रकारे दुचाकी वाहनांचे अपघात वाढले असल्यामुळे भविष्यात गंभीर दुर्घटना होण्याची भीती निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया देताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत

पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील खड्डे बुजवण्याकरिता पालिका प्रशासन कोट्यवधी रुपये खर्च करते. परंतु, कामातील हलगर्जीपणामुळे हे खड्डे योग्य पद्धतीने बुजवले जात नाही. तसेच, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक भागात खड्डे बुजवण्याचे कामच झाले नसल्याची माहिती मिळाली आहे. प्रामुख्याने मिरा रोड स्थानकाबाहेरील परिसर, घोडबंदर मार्ग आणि मिरा भाईंदर मुख्य मार्गावर खड्डे अधिक आहेत.

धक्कदायक बाब म्हणजे, या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असल्यामुळे भविष्यात गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिरा भाईंदर मुख्य मार्गावरील हा रस्ता मिरारोड व भाईंदरला जाणारा रस्ता असून या रस्त्यावर सद्या मेट्रोचे काम सुरू आहे, त्यामुळे अगोदरच हा रस्ता अरुंद झाला आहे. या रस्त्यावरून शहराच्या इतर भागात जाणारे रस्ते आहेत. यामुळे या रस्त्याला विशेष महत्त्व आहे. काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे रस्ते सर्वत्र खड्डेमय झाले आहेत. काशीमिरा, प्लेझेंट पार्क, हाटकेश, सिल्व्हर पार्क, एस.के.स्टोन, बेव्हरली पार्क, शिवार गार्डन, दीपक हॉस्पिटल, गोल्डन नेस्ट फाटक रोड या भागात मोठमोठे खड्डे असल्याने वाहन चालकांना खड्ड्यातून वाहने चालवताना मोठा त्रास होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे, यंदा बाप्पाची आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार नाही. परंतु, शहरातील खड्ड्यांची परिस्थिती पाहता घरगुती व सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी जाण्याकरिता मोठी कसरत करावी लागण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. मेट्रोचे काम आणि मल निस्तरण पाईप लाईनचे काम करण्यात आले होते. परंतु, आता या भागातील रस्त्यांचेच काम करण्यात येत आहे. अशी माहिती कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग दिपक खांबित यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.

दरम्यान, खड्ड्यांमुळे बाईक तसेच गाडीने प्रवास करणे कठीण झाले आहे. प्रशासनाकडे आम्ही गणेशोत्सव सुरू होण्याच्या अगोदर खड्डे बुजवण्याची मागणी केली होती. दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन झाले आहे. पुढे पाच, सात, दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणे बाकी आहे. मात्र, अजूनही खड्डे बुजवण्याचे ठोस काम झालेले नाही. प्रशासनाने लवकरात लवकर खड्डे बुजवावेत, अन्यथा आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात आहोत, अशी प्रतिक्रिया काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी 'ईटीव्ही भारत' ला दिली.

हेही वाचा-धक्कादायक...! महिन्याभरात कोरोनामुळे एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details