महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडीचा शिलेदार कोण होणार? मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत अटीतटीचा सामना

भिवंडीचा शिलेदार होण्यासाठी मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत भाजप-काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये अटीतटीचा सामना रंगणार आहे. तर दुसरीकडे मातब्बर बंडखोरांची साथ युती-आघाडीच्या उमेदवारांना मिळाल्याने उमेदवारांसह बंडखोरांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

By

Published : May 21, 2019, 10:26 PM IST

ठाणे

ठाणे - भिवंडीचा शिलेदार होण्यासाठी मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत भाजप-काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये अटीतटीचा सामना रंगणार आहे. तर दुसरीकडे मातब्बर बंडखोरांची साथ युती-आघाडीच्या उमेदवारांना मिळाल्याने उमेदवारांसह बंडखोरांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

काँग्रेसच्या तिकिटावर २०१४ मध्ये निवडणूक लढवणारे कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील आणि युतीच्या विरोधात शिवसेनेचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा या दोघांनी बंडखोरी करीत अर्ज दाखल केले होते. मात्र, अपक्ष निवडणूक लढवून भाजपचे खासदार कपिल पाटील यांना मात देऊ शकत नाही. त्यामुळे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी अर्ज मागे घेत भाजपला विरोध कायम ठेवत काँग्रेसला मदतीचा हात दिला. तर विश्वनाथ पाटील यांना यंदा काँग्रेसने तिकीट नाकारल्याने त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपला साथ दिली. त्यामुळे युती-आघाडीच्या उमेदवारांसह बंडखोरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

विशेष म्हणजे बंडखोर विश्वनाथ पाटील हे गेल्यावेळी काँग्रेसचे उमेदवार होते. त्यावेळी त्यांनी ३ लाखांपेक्षा अधिक मते मोदी लाटेतही मिळवली होती. त्यापाठोपाठ त्यावेळी मनसेच्या वतीने सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी १ लाखांच्या जवळपास मते मिळवली होती.

यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये विश्वनाथ पाटील यांनी बंडखोरी केल्याने त्यांच्या कुणबी सेनेत दोन गट निर्माण झाले. एका गटाने उघडपणे काँग्रेसचे काम केले. तर राज ठाकरे यांना मानणारा वर्गही या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर असून मनसेचे इंजिन आघाडीच्या डब्ब्याला जोडल्याने मनसेच्या कार्यकत्यांनीही काँग्रेस उमेदवाराला बऱ्यापैकी मदत केली. एकंदरीतच यंदाच्या निवडणुकीतील वाढलेल्या दीड टक्का मतांमुळे अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता आहे. तर भिवंडीतील शहरी भागातही मुस्लीम मतदारांनी काँग्रेसच्या पारड्यात भरभरून मते टाकल्याने भाजप आणि काँग्रेस उमेदवारांमध्ये भिवंडीचा शिलेदार होण्यासाठी शेवटच्या मतमोजणीच्या फेरीपर्यंत लढाई होणार आल्याचे दिसून येत आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार खासदार कपिल पाटील, काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. अरुण सावंत यांच्यासह 15 उमेदवार नशीब अजमावत आहेत. येत्या गुरुवारी 23 मे रोजी मौजे भावाळे येथील प्रेसिडेन्सी हायस्कूलमध्ये मतमोजणी होणार आहे. त्यामुळे भिवंडीतील मतदारांमध्येही यंदाच्या निवडणूक निकालाविषयी कमालीची उत्सुकता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details