मीरा भाईंदर - गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या आगरी भवन निर्मितीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शुक्रवारी या भवन निर्मिती करीता आवश्यक असलेले बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र प्राप्त झाले असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मीरा भाईंदर शहरातील मूळ आगरी समाजाकरिता आगरी भवनाची निर्मिती करण्याची मागणी गेल्या काही काळापासून सातत्याने करण्यात येत होती. या करीता स्थानिक आगरी समाजाकडून 'आगरी समाज उन्नती मंडळाची' स्थापना करण्यात आली होती. मात्र वेगेवेगळ्या कारणामुळे या भवनाच्या निर्मतीत अळथले निर्माण होत होते. परंतु आता या भवन निर्मिती करीता 'बांधकाम प्रारंभ प्रमाण पत्र' प्राप्त झाल्याने आगरी समाज उन्नती मंडळाचा आगरी समाज भवन बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कुठे होणार आहे आगरी भवन...?
सामाजिक वनीकरण व खेळाचे मैदानसाठीचे मूळ आरक्षण क्रमांक १२२ हे विकसीत न करताच आधी बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवनला मंजुरी देण्यात आली होती. नंतर आगरी समाज भवन म्हणून याच आरक्षणातील जागा देण्यासाठी ठराव करून तो प्रस्ताव शासनाकडे पाठवला गेला होता. शासनाने आणखी एक सांस्कृतिक भवन म्हणून वनीकरणाच्या आरक्षणातून मोकळी 6 हजार चौ.मी. जागा वगळून आणखी एक सांस्कृतिक भवनचे १२२अ हे आरक्षण अस्तित्वात आणले. तर यातील मूळ आरक्षण विकसित न करताच भूखंड वगळण्याचे काम केले. महासभेने आगरी समाज उन्नती मंडळास वार्षिक १२ हजार भाडे प्रमाणे देण्याचा ठराव मंजूर केला. महासभेचा ठराव तत्कालीन आयुक्त बालाजी खतगावकर यांनी शासनाच्या नगरविकास विभागास मंजूरी करीता पाठवला होता. आयुक्तांनीच बीओटी तत्वावर सदर भूखंड देण्याची निवीदा काढली. ही जागा मंडळास ३० वर्ष भाडे कराराने मिळाली असून सदर जागेचे पहिल्या वर्षी १५ हजार भाडे असून दर वर्षी त्यात वाढ करण्यात येणार आहे. मंडळाने येथे ६० हजार चौ.मी. फुटाचे बांधकाम तळ अधिक दोन मजले बांधायचे असून त्यासाठी आगरी समाज उन्नती संस्थेला ३५ कोटींचा खर्च करावा लागणार आहे. सांस्कृतिक भवन शहरातील सर्व समाज, धर्मियांसाठी खुले ठेवावे लागणार आहे. त्यातील ३०दिवस पालिकेला विनामूल्य द्यावे लागणार आहे.
भाजप पक्षाकडून सातत्याने प्रयत्न
आगरी भवन निर्मिती करीता भाजप पक्षाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत होते. आता हे भवन तयार होत असल्यामुळे आमच्या पक्षातदेखील आनंदाचे वातावरण आहे अशी प्रतिक्रिया महापौर जोस्ना हसनाळे यांनी व्यक्त केली.
आमच्या समाजचे भवन तयार होत आहे. यांचा आम्हाला फार आनंद आहे. भविष्यात या भवनांचा खूप मोठा फायदा समजला होईल अशी प्रतिक्रिया आगरी समाज उन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष रोहिदास पाटील यांनी दिली.