महाराष्ट्र

maharashtra

भिवंडीत ५३ टक्के मतदान; प्रशासनाने मतदारांना आवाहन करूनही टक्केवारी घसरली

By

Published : Oct 22, 2019, 8:41 AM IST

या निवडणुकीसाठी महिला, पुरुष व युवक, युवतींनी मतदान करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे चमत्कारीक निकाल लागण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, प्रशासनाने मतदारांना आवाहन करूनही यंदाही टक्केवारी घसरली

मतदान करताना नागरिक

ठाणे- भिवंडीतील तीनही विधानसभा मतदारसंघात मतदानादिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुमारे 4 लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे सुमारे ५३ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.

हेही वाचा -मालवणीत तृतीयपंथी बांधवांनी बजावला मतदानाचा हक्क

शहर व ग्रामीण भागात किरकोळ वादविवादाच्या घटना वगळता शांततेत मतदान पार पडले. तर, काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम बंद पडण्याचे प्रकार झाल्याने निवडणूक अधिकारी व पोलीस यंत्रणेने तत्काळ धावपळ करून मतयंत्रे कार्यान्वीत केले. मतदान काळात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. त्यामुळे कोणतेही गुन्हे दाखल झाले नाहीत.

दरम्यान, काही ठिकाणी सायंकाळी ७ वाजेपर्यंत मतदान सुरुच होते. त्यामुळे मतदान केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत पोलीस बंदोबस्त कायम होता. या निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान करावे, असे निवडणूक यंत्रणेकडून वारंवार आवाहन करून देखील २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा मतदानाची टक्केवारी घसरली आहे.

हेही वाचाएक्झिट पोलमध्ये राज ठाकरेंना धक्का; मतदारांनी पुन्हा नाकारले?

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भिवंडी ग्रामीणमध्ये ६६.२४, पश्चिम विधानसभा ४९.५८ तर भिवंडी पूर्वमध्ये ४४.३० टक्के असे मतदान झाले होते. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भिवंडी ग्रामीणमध्ये ५७.८८ भिवंडी पश्चिममध्ये ४२ टक्के तर भिवंडी पूर्वमध्ये ४५ टक्के असे मतदान झाले आहे.

१३७ - भिवंडी पूर्व, १३६ - भिवंडी पश्चिम आणि १३४ - भिवंडी ग्रामीण या तीनही मतदारसंघात सकाळी ७ वाजल्यापासून संथ गतीने मतदानाला सुरुवात झाली होती. यावर्षी लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत प्रथमच ईव्हीएमसोबत मत चिन्ह दर्शवणारे यंत्र (व्हीव्हीपॅट मशीन) असल्यामुळे मतदारांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते. या यंत्रामध्ये आपण कोणाला मतदान करतो हे चिन्ह दिसत होते. त्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, कालवार, काल्हेर, ठाकूरपाडा, भादवड, हायवे दिवे, कोपर, ईदगाह रोड, ताडाळी या मतदान केंद्रांवर मतदान यंत्रात काही वेळ बिघाड निर्माण झाला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशाने राखीव मशीनद्वारे मतदान पुन्हा सुरळीत करण्यात आले.

हेही वाचा -नेते, कार्यकर्ते निवडणुकानिमित्त येतात; नंतर कोणी ढुंकूनही बघत नाही, दिव्यांग महिलेची खंत

भिवंडी ग्रामीण मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार आमदार शांताराम मोरे, राष्ट्रवादीच्या उमेदवार माधुरी म्हात्रे, मनसे उमेदवार शुभांगी गोवारी, भिवंडी पूर्वचे शिवसेना आमदार रुपेश म्हात्रे, काँग्रेसचे संतोष शेट्टी, समाजवादी पार्टीचे रईस शेख, मनसेचे मनोज गुळवी व भिवंडी पश्चिमचे भाजप उमेदवार आमदार महेश चौघुले, एमआयएम पक्षाचे खालिद गुड्डू शेख, काँग्रेसचे शोऐब गुड्डू खान या प्रमुख उमेदवारांसह विविध पक्ष व अपक्ष असे २८ उमेदवारांचे भवितव्य सोमवारी सायंकाळी मतदान यंत्रात बंद झाले आहे. मतमोजणी गुरुवार २४ ऑक्टोबर रोजी भिवंडी ग्रामीणची मिल्लतनगर फरान हॉल, भिवंडी पूर्व मतदारसंघाची मतमोजणी संपदा नाईक हॉल, भादवड तर भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघाची कामतघर येथील वऱ्हाळदेवी माता मंगल भवन येथे होणार आहे. त्यामुळे शिवसेना, भाजप, समाजवादी पक्ष, एमआयएम, काँग्रेस, वंचित आघाडीसह विविध अपक्ष उमेदवारांमध्ये निकालांविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

या निवडणुकीसाठी महिला, पुरुष व युवक, युवतींनी मतदान करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे चमत्कारी निकाल लागण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे उमेदवारांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट दिसत होते. मतदार यादीत मृत, बोगस, दुबार नावे आढळून आली तर अनेक ठिकाणी नावे यादीतून गायब झाल्याने मतदार नाराज दिसले.

ABOUT THE AUTHOR

...view details