महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 8, 2023, 2:34 PM IST

ETV Bharat / state

Thane Accident: भिवंडीतील दोन वेगवेगळ्या भीषण अपघातात, बाप लेकासह चार जणांचा मृत्यू

भिवंडी तालुक्यातील दोन वेगवेगळ्या भीषण अपघातात बाप लेकासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी भिवंडी तालुका आणि गणेशपुरी पोलीस ठाण्यात या दोन्ही भीषण अपघाताच्या घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Thane Accident
भीषण अपघातात बाप लेकासह चार जणांचा मृत्यू

ठाणे: पहिल्या घटनेत भिवंडीतील पोगाव परिसरात पाण्याच्या टँकरने कारला दिलेल्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण अजूनही मृत्यूशी झुंज देत आहे. त्याच्यावर ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घनश्याम केसरवाणी (५५, रा. टेमघर पाडा, भिवंडी) यांनी एमएच ०२ सी बी १३२८ क्रमांकाची सेकंडहँड वॅगन आर कार खरेदी केली होती. घनश्याम केसरवाणी हे त्यांचा मुलगा सौरव केसरवाणी (२४) याच्यासोबत तालुक्यातील पोगाव परिसरात कार चालवायला शिकवण्यासाठी गेले होते. दरम्यान कार शिकत असताना चुकीच्या बाजूने चालवत असलेली कार समोरून येणाऱ्या टँकर क्रमांक एमएच ०४ सीयू ५८०४ ला धडकली. धडकेनंतर कारचा चक्काचूर झाला. कार चालवायला शिकत असतानाच दिनेश केसरवाणी (सोनू) हा जागीच ठार झाला. तर कार मालक पिता-पुत्र गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



उपचारादरम्यान मृत्यू: शुक्रवारी सकाळी सात वाजता घनश्याम केसरवाणी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कार अपघातातील मृतांचा आकडा दोनवर गेला आहे. जखमी सौरव केसरवाणी हा ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये अजूनही जीवन-मरणाशी झुंज देत आहे. सद्यस्थितीत भिवंडी तालुका पोलिसांनी कार अपघाताला मृत दिनेशला जबाबदार धरून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.



दुसऱ्या घटनेत तालुक्यातील अंबाडी : शिरसाड या मार्गांवरील कोपरोली जवळ जगदंब ढाब्याच्या समोर कार व मोटर सायकलच्या धडकेत पितासह त्याच्या तीन वर्षाच्या चिमुकल्या बाळाचा जागीच मृत्यू झाला. तर दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. अल्पेश बाळकृष्ण पाटील (४०) व इशांत अल्पेश पाटील(३) या बाप लेकाचा या अपघातात मृत्यू झाला आहे. अल्पेश पाटील हा अंबाडी येथे राहत असून, तो आपल्या पत्नी अमृता पाटील (३५) व मुलगा पोंरस पाटील( १०) यांच्या समवेत मोटर सायकल वरून गणेशपूरी येथे साखरपुडा कार्यक्रमास चालले होते.



गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात: कोपरोली येथे त्याची मोटरसायकल आली असता वज्रेश्वरी दिशेकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या त्यांच्या मोटरसायकलला येऊन धडकली. यामध्ये दोघा बापलेकाच्या डोक्याला मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अल्पेशची पत्नी व दुसरा मुलगा हे गंभीर जखमी असून अंबाडी येथील साईदत्त रुग्णालयात उपचार सुरू आहे. सदर अपघातातील कार चालक सुरज रघुनाथ शिंदे हा फरार आहे. याबाबत गणेशपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांनी अपघातस्थळी तातडीने पोहचून जखमीना पुढील उपचारासाठी पाठविले. तर कार चालक याच्यावर गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



हेही वाचा: Accident News लोणंदनीरा मार्गावर एसटीदुचाकीचा तर मुंबईपुणे मार्गावर ट्रककारचा अपघात सात जणांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details