ठाणे -भिवंडीत धोकादायक यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळून तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर तीन मजूर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील काटई ग्रामपंचायत हद्दीत देवानंद कंपाउंड परिसरात असलेल्या एका यंत्रमाग कारखान्यात घडली आहे. राजू उर्फ रणछोड प्रजापती ( वय ५० वर्ष ), भगवान मामा ( वय ५५ वर्ष ), मनसुख भाई ( वय ४५ वर्ष ) अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मजुरांची नावे आहेत.
भिंतींच्या दुरुस्तीचे काम होते सुरू
भिवंडी तालुक्यात काटई ग्रामपंचायत हद्दीत देवानंद कंपाउंड येथे हा धोकादायक यंत्रमाग कारखाना होता. कारखान्याच्या भिंती जीर्ण झाल्याने हा यंत्रमाग कारखाना मागील चार दिवसांपासून बंद होता. या कारखान्याच्या जीर्ण झालेल्या भिंतींच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. मात्र हे काम सुरू असतानाच लोखंडी अँगल व पत्र्याच्या वजनामुळे भिंत कोसळली व त्यासोबतच छताचे लोखंडी अँगल व पत्रे देखील कोसळले. या दुर्घटनेत तीन बांधकाम मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर तीन जण या दुर्घटनेत जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद निजामपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.