नवी मुंबई -वाशीमधील महापालिका रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे 20 वर्षीय तरुणीचा बळी गेल्याचा आरोप मृत मुलीच्या पालकांनी केला आहे. संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नवी मुंबईत तुर्भे येथे राहणाऱ्या बाळू कसबे यांच्या पूजा कसबे या 20 वर्षीय मुलीला श्वसनाचा त्रास होता. त्यामुळे तिला नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले. मात्र, तेथे तिच्यावर उपचार न करता तिला नेरुळमधील स्वर्गीय मीनाताई ठाकरे रुग्णालयात पाठविण्यात आले. दम लागत असल्याने तिला वाशीमधील पालिकेच्या रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले. तेथे तिला ऑक्सिजन लावण्यात आले व तिची कोविड टेस्ट करण्यात आली. तिची कोविड टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर वाशीमधील कोविड रुग्णालयातून स्थलांतरीत करण्यास मुलीच्या वडिलांना सांगण्यात आले.
नॉन कोविड रुग्णालय शोधण्यासाठी पूजाच्या वडिलांची वणवण सुरूच होती. दरम्यान, वाशी महापालिका रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तरुणीला त्याच रुग्णालयामध्ये दुसऱ्या मजल्यावर हलविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तिला दुसऱ्या मजल्यावरील वार्डमध्ये ठेवण्यात आले. दरम्यान, पूजा हिला पुन्हा श्वसनाचा त्रास सुरू झाला. श्वास कोंडल्यामुळे तिला सतत तहान लागत होती. त्यावेळी तरुणीला ना पाणी देण्यात आले, ना ऑक्सिजन लावण्यात आले. ही बाब पूजाने तिच्या वडिलांना फोन करून सांगितली. त्यामुळे बाळू यांनी त्वरित मनपा रुग्णालय गाठले आणि माझ्या मुलीला निदान पाणी तरी द्या, असे सांगितले असता, आम्ही फक्त टेबलावर कामे करतो, असे उत्तर डॉक्टरांनी दिले.