महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीचे अन्नछत्र सुरू, निर्बंधामुळे गेल्या 2 वर्षांपासून होते बंद - अन्नछत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असणारे विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीचे अन्नछत्र पूर्ववत सुरू करण्यात आले आहे. वारकरी व भाविकांनी अन्नछत्रामध्ये महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.

Vitthal Rukmini temple committee food pantry resumed
अन्नछत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती

By

Published : Feb 19, 2022, 9:57 PM IST

पंढरपूर (सोलापूर) -कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असणारे विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीचे अन्नछत्र पूर्ववत सुरू करण्यात आले आहे. वारकरी व भाविकांनी अन्नछत्रामध्ये महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.

हेही वाचा -गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची वेळापूर पोलीस ठाण्यास भेट

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पंढरपुरात येणाऱ्या वारकरी भाविकांना महाप्रसाद मिळावा या हेतूने संत तुकाराम भवन येथे अन्नछत्र चालवले जाते. सदरचे अन्नछत्र सन 1996 पासून भाविकांच्या सेवेत आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. शासन आदेशान्वये राज्यातील सर्व मंदिरे 7 ऑक्टोबर 2021 पासून भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर, इतर सर्व देवस्थानमध्येही अन्नछत्रालय सुरू केलेली आहेत. विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीचे देखील अन्नछत्र सुरू करावे, अशी भाविकांकडून मागणी होत होती. भाविकांची मागणी विचारात घेऊन, मंदिर समितीने श्री. संत तुकाराम भवन येथील अन्नछत्र 19 फेब्रुवारी 2022 पासून पूर्ववत सुरू करण्याचा नुकताच 13 फेब्रुवारीच्या मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय घेतला होता. त्यानुसार श्री. संत तुकाराम भवन येथील अन्नछत्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेवून 19 फेब्रुवारी, 2022 पासून पूर्ववत सुरू करण्यात आले असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले आहे.

अन्नछत्रात दररोज दुपारी 12 ते 2 या कालावधीत मोफत भोजन उपलब्ध करून देण्यात येते. त्याचा दैनंदिन 1 हजार 200 ते 1 हजार 500 भाविक लाभ घेतात. या अन्नछत्रासाठी मंदिर समितीची अन्नछत्र वाढदिवस ही योजना असून, या योजनेत किमान रू. 25 हजार रुपयांपासून पुढे रक्कम देणगी स्वरुपात जमा करून इच्छित दिवशी अन्नछत्रात अन्नदान करता येणार आहे. तसेच, भाविकांना अन्नधान्य व किराणा माल स्वरुपात देखील देणगी जमा करता येईल. इच्छुक भाविकांनी अन्नछत्र देणगीत सहभाग नोंदवावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमावेळी मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, शकुंतला नडगिरे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, अन्नछत्र विभाग प्रमुख बलभिम पावले उपस्थित होते.

हेही वाचा -पैशाच्या वादातून शेतमजुराची निर्घृण हत्या; माळशिरस तालुक्यातील घटना

ABOUT THE AUTHOR

...view details