महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 31, 2020, 4:02 AM IST

ETV Bharat / state

सोलापूर जिल्ह्यातील या ग्रामपंचायत निवडणूक रद्द करण्याची मागणी, ग्रामस्थांचा बहिष्कार टाकण्याचा इशारा

अशिया खंडातील सर्वात मोठ्या अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपालिकेमध्ये रुपांतर होण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असतानाच येथील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामुळे शासनाने तात्काळ ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपालिकेत करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Villagers have demanded cancellation of Gram Panchayat elections in Solapur district
सोलापूर जिल्ह्यातील या ग्रामपंचायत निवडणूक रद्द करण्याची मागणी, ग्रामस्थांचा बहिष्कार टाकण्याचा इशारा

पंढरपूर (सोलापूर) - आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपालिकेमध्ये रूपांतर होण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असतानाच येथील ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. माळशिरस तालुक्यातील नातेपुते, महाळुंग श्रीपूर ग्रामपंचायतीचा नगरपंचायत होण्याचा प्रस्तावही अशाच पद्धतीने अंतिम टप्प्यात रखडलेला आहे. शासनाने तात्काळ ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपालिका आणि नगरपंचायतमध्ये करावे, अन्यथा निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकू असा, इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

तिन्ही ग्रामपंचायत ग्रामस्थांकडून प्रांताधिकार्‍यांना निवेदन -

माळशिरस तालुक्यातील अकलूज, महाळुंग व नातेपुते या ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपरिषद व नगर पंचायतींमध्ये करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या जाहीर करण्यात आलेल्या पंचवार्षिक निवडणुका स्थगित करण्यात याव्यात, असे राज्य शासनाच्या वतीने उपसचिव एस. जे. मोघे यांनी १६ डिसेंबरला निवडणूक आयोगाला लेखी कळवले आहे. निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींपैकी तालुक्यातील या तीन ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपरिषद अथवा नगरपंचायतीमध्ये करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने सर्व ग्रामस्थ तसेच गावातील पुढाऱ्यांनी येत्या निवडणुकीत कोणीही अर्ज भरायचा नाही असा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन माळशिरस तहसीलदार व प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे.

रूपांतरित झाल्यानंतरच निवडणुका घ्याव्या -

सध्या या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये होण्याचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे. असे असतानाच राज्य सरकारकडून निवडणूक आयोगाला या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांबाबत विनंती पत्र दिलेले होते. कोणताही विचार न करता प्रक्रिया सुरू झालेली आहे. दोन दोन वेळा निवडणुकांना सामोरे जाणे उमेदवारांना आणि मतदारांना प्रशासनाला अवघड जाईल. यामुळे या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करूनच येथील निवडणूक प्रक्रिया पार पाडावी अन्यथा ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

महाळुंग श्रीपुर ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज न भरण्याचा निर्णय -

येणाऱ्या निवडणुकीसाठी महाळूंग - श्रीपूर गावातून कोणीही उमेदवार अर्ज भरणार नसल्याने, याची दखल निवडणूक आयोगाला व राज्य सरकारला घ्यावी लागणार आहे. लवकरात लवकर महाळुंग-श्रीपुर ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रूपांतरणाची प्रक्रिया पूर्णत्वास नेण्यासाठी शानाकडून हालचाली होतील, अशी अपेक्षा जनतेला आहे. महाळुंग - श्रीपुर ग्रामपंचायत निवडणूक लढविली तर वेळ, पैसा, सर्वांचा वायफट जाणार आहे. शासनावर याचा आर्थिक भार पडणार आहे. सर्व गावकरी पार्टी प्रमुख यांनी सध्याची महाळुंग - श्रीपुर ग्रामपंचायत निवडणूक न लढवण्याचा व कोणतेही फॉर्म न भरण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे, या निर्णयाला सर्वांनी एक मुखी पाठिंबा दिला आहे.

प्रक्रिया अंतिम टप्प्यात -

अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतरणाची प्राथमिक उद्घोषणा १९ सप्टेंबर २०१९ ला करण्यात आली असून अक्षेप मागवण्यात आले असून हे प्रकरण अंतिम टप्प्यात आहे. महाळुंग-श्रीपुर व नातेपुते ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रूपांतरणाची प्राथमिक उद्घोषणा १९ सप्टेंबर २०१९ ला करण्यात आली असून यासंदर्भातही आक्षेप मागवण्यात आले होते. हे प्रकरणही अंतिम टप्प्यात आहे. राज्य शासनाने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये हे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीमध्ये सहभागी न होता निवडणूक रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details