पंढरपूर (सोलापूर) - वेळापूर येथील आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सुयश नारायण जाधवची यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०१८मध्ये पोलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सुयशला रौप्यपदक मिळाले होते. पुरूषांच्या ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात त्याने ही कामगिरी नोंदवली होती. सुयशला महाराष्ट्र शासनाचा शिवछञपती पुरस्कारही मिळाला आहे.
लहानपणीच दोन्ही हात गमावलेल्या सुयशने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही स्तरावर १२५ पदके मिळवली आहेत. घराच्या गच्चीवर पतंग उडवताना सुयशला विद्युत तारेला स्पर्श झाला होता. या घटनेनंतर, काळे पडलेले दोन्ही हात कापावे लागतील, असे मुंबईतील डॉक्टरांनी सांगितले. या सल्ल्यामुळे सुयशचे वडील नारायण जाधव व आई सविता जाधव यांच्या पायाखालची जमीन सरकली. मात्र, त्यांनी जिद्द सोडली नाही. सुयशला वाचवण्यासाठी त्यांनी 'कठीण' निर्णय घेतला.