महाराष्ट्र

maharashtra

देशाच्या विकासामध्ये पोलिसांचे योगदान मोठे - पी. शिवशंकर

By

Published : Oct 21, 2020, 4:36 PM IST

देशात शांतता असेल तरच गुंतवणूक होते आणि गुंतवणूक झाली तरच नवीन रोजगाराची निर्मिती होते, त्यातूनच देशाचा विकास होतो. म्हणूनच देशाच्या विकासामध्ये पोलिसांचे मोठे योगदान आहे. असे मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. १ सप्टेंबर २०१९ ते १ ऑगस्ट २०२० या एका वर्षात देशभरात विविध दलांमध्ये कार्यरत असलेले २६४ पोलीस आपले कर्तव्य पार पाडत असताना हुतात्मा झाले होते.

सोलापूर पोलीस
सोलापूर पोलीस

सोलापूर- कायदा सुव्यवस्था राखून शांतता ठेवत आणि प्रसंगी प्राणाची आहुती देत पोलिसांनी देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान दिले आहे, असे मत महानगर पालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी व्यक्त केले.

२१ ऑक्टोबर राष्ट्रीय पोलीस शहीद स्मृती दिनानिमित्ताने पोलीस मुख्यालय येथे अभिवादन करण्यात आले. त्यावेळी मनपा आयुक्त बोलत होते. देशाला स्वातंत्र्य होऊन ७० वर्ष झाले. स्वातंत्र्या नंतर देशात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी पोलिसांवर आली. सीमेवर सैन्यदल, तर देशात प्राणाची आहुती देत पोलीस आपले कर्तव्य पार पाडत आहेत. नक्षलवादी, माफिया आणि देशाचे शत्रू यांच्याशी लढत देशात शांतता ठेवण्याचे काम पोलिसांनी केले व करीत आहेत.

देशात शांतता असेल तरच गुंतवणूक होते आणि गुंतवणूक झाली तरच नवीन रोजगाराची निर्मिती होते, त्यातूनच देशाचा विकास होतो. म्हणूनच देशाच्या विकासामध्ये पोलिसांचे मोठे योगदान आहे. असेही मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. १ सप्टेंबर २०१९ ते १ ऑगस्ट २०२० या एका वर्षात देशभरात विविध दलांमध्ये कार्यरत असलेले २६४ पोलीस आपले कर्तव्य पार पाडत असताना हुतात्मा झाले होते. त्यामध्ये आंध्रप्रदेश ३, अरुणांचल प्रदेश २, बिहार ९, छत्तीसगड ३५, हरियाणा २, झारखंड ८, कनार्टक १७, मध्यप्रदेश ७, महाराष्ट्र ५, मणीपूर २, पंजाब २, राजस्थान २, तमिळनाडू ३, त्रिपुरा २, उत्तरप्रदेश ८, उत्तराखंड ६, पंश्चिम बंगाल १०, अंदमान निकोबार २, दिल्ली ११, जम्मू आणि काश्मीर १२, आसाम ३, सीमा सुरक्षा बल २४, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल ७, केंद्रीय राखीव सुरक्षा बल २९, अग्निशामक दल ४, आयटीबीपी १८, एमएचए ९, रेल्वे सुरक्षा बल १४, एसएसबी १५, असे एकूण २६४ पोलीस हुतात्मा झाले आहेत. या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.

प्रारंभी पाहुण्यांचे आगमन झाले. त्यानंतर राष्ट्रीय पोलीस शहीद स्मृती दिनाच्या संदेशाचे वाचन पोलीस हवालदार मलकप्पा बनसगोळे, पोलीस हवालदार सागर मुत्तनवार यांनी केले. त्यानंतर पोलीस निरीक्षक कैलास काळे, अजय जगताप यांनी हुतात्मा पोलिसांच्या यादीचे वाचन केले. नंतर राखीव पोलीस दलाचे उपनिरीक्षक भगवान टोणे यांच्या नेतृत्वाखाली शोक शस्त्र परेड करण्यात आली.

सोलापूर शहर पोलीस, सोलापूर ग्रामीण पोलीस आणि राज्य राखीव पोलीस यांचा यामध्ये सहभाग होता. या तिन्ही दलाच्या वतीने हवेत तीन वेळा गोळीबार करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ग्रामीण पोलिसांच्या बॅन्ड पथकाने अभिवादन केले. नंतर प्रमुख पाहुणे मनपा आयुक्त शिवशंकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, राज्य राखीव दलाचे समादेशक राजाराम केंडे यांनी स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर हुतात्म्यांच्या कुटुंबांची व पाहुण्यांची भेट घेतली. शेवटी २ मिनिटे स्तभता पाळून अभिवादन कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सकळे, पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, अरूण फुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नाली देवकते यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच माजी पोलीस अधिकारी संघटनेचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

२६४ हुतात्म्यांमध्ये सोलापूरचा सुपुत्र

आपले कर्तव्य पार पाडताना हुतात्मा झालेल्या पोलिसांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील पुळूज येथील सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक धनाजी व्हनमाने हे गडचिरोली येथे कर्तव्य पार पाडताना हुतात्मा झाले होते. याप्रसंगी त्यांना अभिवादन करण्यात आले.

हेही वाचा-सोलापूर शहराला लागून असलेल्या हिप्परगा तलावातून शहरात पाणी शिरण्याची शक्यता, अधिकाऱ्यांची पाहणी

ABOUT THE AUTHOR

...view details