सोलापूर(पंढरपूर) - देशातील प्रत्येक मतदार संघात पन्नास टक्के महिला मतदार आहेत. महिला मतदारांचे लोकशाहीमध्ये योगदान मोठे आहे. मतदार संघातील सर्वसामान्य महिलांसाठी काम करायचे आहे. महिला प्रतिनिधी म्हणून त्यांना ताकद देण्याची माझी इच्छा आहे, असे प्रतिपादन पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील एकमेव महिला उमेदवार शैलजा गोडसे यांनी केले आहे. शैलजा गोडसे यांनी पंढरपूर तालुक्यातील रांझणी या गावातून प्रचाराचा शुभारंभ केला.
शैला गोडसेंनी मतदारांना आवाहन केले मातब्बर नेत्यांचे आव्हान -
शैलजा गोडसे यांना भाजपकडून समाधान अवताडे यांचे तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचे आव्हान असणार आहे. तसेच, अपक्ष म्हणून सिद्धेश्वर आवताडे यांचे मंगळवेढा येथून तर ग्रामीण भागातून स्वाभिमानीचे सचिन शिंदे पाटील यांचे आव्हान आहे. त्यामुळे शैलजा गोडसे यांच्यासाठी ही पोटनिवडणूक नक्कीच सोपी नसणार आहे.
मतदार संघातील जनतेसाठी मी उभी -
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत प्रस्थापित पक्षातील उमेदवार उभे आहेत. त्यामुळे त्यांच्या सभेला राज्यातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. मी मात्र, जनतेसाठी निवडणूक लढवत आहे. समोर कोण आहे याकडे लक्ष देण्यापेक्षा मतदारसंघातील जनतेकडे लक्ष देण्याला माझे प्राध्यान्य आहे. त्यामुळे मी ही निवडणूक लढवत आहे. जनता खूप मोठी आहे तीच मला न्याय देईल, असा विश्वास गोडसे यांनी व्यक्त केला.
पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील जनतेने ताकद द्यावी -
मतदार संघातील दोन्ही तालुक्यांतील विकासाबाबत विचारले असताना शैलाजा गोडसे म्हणाल्या, तालुक्यामध्ये फक्त एमआयडीसी हाच प्रश्न नाही. हा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. मात्र, मतदार संघात अजूनही अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न मी चळवळीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी जनतेने ताकद द्यावी. मतदारसंघातील लोकांचा आवाज विधानसभेत उठवण्यासाठी एक संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी मतदारांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कारवाई
आमदार भारत नाना भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील जागा रिक्त झाली आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मतदार संघ सोडण्यात आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा धर्म पाळत असताना शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. मात्र, शिवसेना नेत्या शैलजा गोडसे यांनीपंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अपक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या बंडखोर नेत्या शैलजा गोडसे यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली.