महाराष्ट्र

maharashtra

माघवारी निमित्ताने पंढरपुरात दोन दिवस संचार बंदी? वारकऱ्यांना न येण्याचे आवाहन

By

Published : Feb 6, 2021, 12:10 AM IST

Updated : Feb 6, 2021, 2:30 AM IST

पंढरपूर शहरासह तालुक्यातील काही गावांमध्ये माघी वारी काळात 144 कलम लागू होण्याची शक्यता आहे. माघवारी निमित्ताने सोलापूर जिल्ह्यात तीन स्तरावर नाकाबंदीचे नियोजन करण्यात आले आहे. 22 ते 23 फेब्रुवारी पंढरपूरवासियांना व परगावी भाविकांना गर्दी न करण्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आवाहन केले आहे.

पंढरपुरात दोन दिवस संचार बंदी
पंढरपुरात दोन दिवस संचार बंदी

पंढरपूर- वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची माघ वारी यात्रा 22 ते 23 फेब्रुवारीला पार पडणार आहे. या यात्रेत भाविकांची मोठी गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही पूर्णपणे नियंत्रणात आला नाही. त्यामुळे यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर प्रशासनाकडून दोन दिवसाचा संचार बंदीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तसेच संचारबंदी काळात सोलापूर जिल्ह्यात तीन स्तरावर नाकाबंदी असणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेमध्ये दिली.

पंढरपुरात दोन दिवस संचार बंदी? वारकऱ्यांना न येण्याचे आवाहन
प्रशासनाचा दोन दिवसाच्या संचार बंदीचा प्रस्ताव..

पंढरपूर येथील विठुरायाची आषाढी, कार्तिकी यात्रा कोरोना संसर्गामुळे रद्द करण्यात आली होती. त्यातूनच माघी वारीमध्ये भाविकांची गर्दी पंढरपूरमध्ये होऊ नये, म्हणून 22 ते 23 फेब्रुवारी रोजी प्रशासनाकडून दोन दिवसाच्या संचार बंदीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. पोलिसांकडून माघी वारी दरम्यान पंढरपुरात राज्यातील भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी येऊ नये, असे आव्हान करण्यात आले आहे. तर पंढरपूरवासियांनीही याबाबतीत सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले.

माघ वारीदरम्यान तीन स्तरावर नाकाबंदी

पंढरपूर येथे माघ वारीदरम्यान भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून सोलापूर जिल्ह्यात तीन स्तरावरती नाका-बंदी केली जाणार आहे. यामध्ये जिल्हास्तर, तालुका स्तर, शहर स्तरावरती ही नाकाबंदी असणार आहे. नाका-बंदी दरम्यान कोणत्याही परगावातील व्यक्तीला पंढरपुरात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच पंढरपूर येथे माघवारी निमित्ताने मोठा पोलीस फौजफाटा तैनात असणार आहे.

दोन दिवस विठुरायाचे दर्शन बंद..

पंढरपूर येथे माघी वारी निमित्ताने वारकरी व भाविकांची गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून 22 ते 23 फेब्रुवारी रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन बंद ठेवण्यात आले आहे. तसेच या काळात कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. 24 फेब्रुवारीपासून मुखदर्शन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

Last Updated : Feb 6, 2021, 2:30 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details