सोलापूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वयंनिधी योजनेंतर्गत शहरातील फेरीवाल्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी 10 हजार रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या योजनेने 5 हजार फेरीवल्यांना लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेत फेरीवाल्यांनी पुन्हा एकदा व्यवसायाची उभारणी करावी, असे आवाहन सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे.
गेल्या 4 महिन्यापासून जिल्ह्यासह देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या लॉकडाऊनमुळे अनेक छोट्या मोठ्या व्यवसायिकांचे कंबरडे मोडले. यामध्ये रोजच्या व्यवसायावर अवलंबून असलेल्या फेरीवाल्यांचे मोठे नुकसान झाले. आधीच कुटुंबाची आर्थिक बाजू कमकुवत असलेल्या फेरीवाल्यांना लॉकडाऊनमध्ये अत्यंत हलाखीचे जीवन जगावे लागले. या पार्श्वभूमीवर स्वयंनिधी आत्मनिर्भर योजनेंतर्गत सोलापूर महानगरपालिका फेरीवाल्यांना कर्ज देणार आहे. या योजनेंतर्गत सोलापूर शहरातील 5 हजार फेरीवाल्यांना याचा लाभ घेता येणार आहे.